शिरोळचा कल्लेश्वर तलाव गाळातच..!
By Admin | Updated: August 11, 2015 22:29 IST2015-08-11T22:29:23+5:302015-08-11T22:29:23+5:30
प्रस्ताव लालफितीत : तीन वर्षांपासून सर्वांचेच दुर्लक्ष

शिरोळचा कल्लेश्वर तलाव गाळातच..!
संदीप बावचे - शिरोळ -येथील ऐतिहासिक कल्लेश्वर तलावातील गाळ काढण्याचा प्रस्ताव गेल्या तीन वर्षांपासून कागदावरच राहिला आहे. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा स्त्रोत कायम तसाच राहावा यासाठी तलावातील गाळ काढण्याबाबतचा प्रस्ताव शिरोळ पंचायत समितीमार्फत जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र, या प्रस्तावाकडे बऱ्याच वर्षांपासून सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. यंदाचे पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे किमान या वर्षीतरी हा प्रस्ताव मंजूर करून पुढील वर्षाचे नियोजन करता येणार आहे.छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील अनेक वर्षे दुर्लक्षित असणाऱ्या कल्लेश्वर तलावाचे सौंदर्य हरवून गेले आहे. कारण तलावात पाणीसाठा होणारे चाच (नाले) जादा शेतीच्या हव्यासापोटी नाहीसे झाले. त्यामुळे या तलावात सध्या गाजर गवत, तण, सरपटणारे प्राणी, ठिकठिकाणी खंदक व तलावाभोवती अतिक्रमणाचा विळखा असे स्वरूप आले असून, एकेकाळी शिरोळकरांची तहान भागविणारा कल्लेश्वर तलाव कायम दुर्लक्षित राहिला आहे. शिरोळच्या वैभवात भर घालणाऱ्या या तलावाचे सौंदर्य पुन्हा निर्माण करण्यासाठी व तलावाचे पर्यटनस्थळ होण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. तलावात शासनाच्या निधीतून बगीचा, वृक्षसंवर्धन, योग्य पाणीसाठा, स्वच्छता, तलावाला संरक्षित भिंती, आदी सुविधा निर्माण होतील. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन प्रयत्न करणे गरजेचे आहेत.
तीन वर्षांपूर्वी या तलावातील गाळ कढण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला होता. दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्यात शासनाकडून तलाव, विहिरी, नाले, बंधाऱ्यातील गाळ काढून त्याठिकाणी पाण्याचा स्त्रोत चांगल्या पद्धतीने वाढावा या हेतुतून शासनाने उपक्रम हाती घेतला होता. या मोहिमेअंतर्गत शिरोळ तालुक्यात टंचाईग्रस्त योजनेतून तलाव, बंधारे यातील गाळ काढण्यात आला होता. यंदा पाऊस नसल्यामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ऐतिहासिक कल्लेश्वर तलावातीलही गाळ काढण्याबाबचा प्रस्ताव देण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर या तलावातील गाळ काढण्यास परवानगी मिळणार होती. मात्र, हा प्रस्ताव शासनाच्या लालफितीतच
अडकून पडला आहे. हा प्रस्ताव
मंजूर झाला असता तर कल्लेश्वर तलावाला मोकळा श्वास मिळाला असता. मात्र, ‘शासकीय काम, सहा महिने थांब’ अशीच अवस्था झाली आहे.