कोरोनाकाळात परिचारिकांनी केलेली रुग्णसेवा अतुलनीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:27 IST2021-09-25T04:27:29+5:302021-09-25T04:27:29+5:30
इस्लामपूर येथे नर्सिंग महाविद्यालयातील परिचारिका कोर्सच्या विद्यार्थिनींच्या शपथविधी समारंभात डॉ. नरसिंह देशमुख यांनी मार्गदर्शन केले. या वेळी शामरावकाका पाटील, ...

कोरोनाकाळात परिचारिकांनी केलेली रुग्णसेवा अतुलनीय
इस्लामपूर येथे नर्सिंग महाविद्यालयातील परिचारिका कोर्सच्या विद्यार्थिनींच्या शपथविधी समारंभात डॉ. नरसिंह देशमुख यांनी मार्गदर्शन केले. या वेळी शामरावकाका पाटील, प्रा. शामराव पाटील, आर. डी. सावंत, एन. आर. मुजावर, डॉ. विलास काळे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : परिचारिका हे सेवेचे व्रत आहे. फ्लॉरेन्स नाईन्टिंगल यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून हे व्रत पार पाडा. कोरोनाच्या प्रतिकूल काळात परिचारिकांनी केलेली रुग्णांची सेवा देशातील जनता कधीही विसरणार नाही, असा विश्वास उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नरसिंह देशमुख यांनी व्यक्त केला.
कासेगाव शिक्षण संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमधील परिचारिका कोर्सच्या विद्यार्थिनींच्या शपथविधी समारंभात ते बोलत होते. केआरपी कॉलेजच्या सभागृहात हा समारंभ झाला. कासेगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शामराव पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, संस्थेचे सचिव आर. डी. सावंत, केआरपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विलास काळे, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य एन. आर. मुजावर उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले, आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी जीव धोक्यात घालत कोरोनाच्या काळात आमच्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसेवा केली आहे. त्यांच्या कामाचे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे.
प्रा. शामराव पाटील म्हणाले, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरातील विद्यार्थी, विशेषत: विद्यार्थिनींना सेवेच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी नर्सिंग महाविद्यालय सुरू केले आहे. या माध्यमातून अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी करिअर करत असल्याचे पाहून समाधान वाटते.
प्राचार्य आर. डी. सावंत म्हणाले, तुम्ही जेव्हा परिचारिका कोर्स पूर्ण करून बाहेरच्या जगात जाल, तेव्हा तुमच्यासाठी शासकीय, खाजगी क्षेत्रात मोठ्या संधी आहेत.
प्राचार्य एन. आर. मुजावर यांनी स्वागत व प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या १६ वर्षांच्या प्रगतीचा आढावा मांडला. डॉ. महेश बोधे यांनी विद्यार्थिनींना शपथ दिली. दीप्ती कांबळे यांनी आभार मानले. परवीन शेख, निखिल वायदंडे यांनी सूत्रसंचालन केले.