कालबाह्य खताची नव्या पोत्यातून विक्री

By Admin | Updated: June 21, 2014 00:22 IST2014-06-21T00:18:28+5:302014-06-21T00:22:04+5:30

कुपवाड एमआयडीसीतील प्रकार : इस्लामपूरला खताचा पुरवठा; कृषी विभागाकडून तपासणी

Sell ​​out of unmarked new sapling | कालबाह्य खताची नव्या पोत्यातून विक्री

कालबाह्य खताची नव्या पोत्यातून विक्री

सांगली : कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील एका गोदामामधील कालबाह्य खत नवीन पोत्यात भरून ते विक्रीसाठी पाठविले जात आहे. खतामधील ही बोगसगिरी पाहणाऱ्या एका वाहनचालकाने ‘लोकमत’च्या प्रतिनिधीला दूरध्वनीवरून ही माहिती दिली. त्यानंतर चौकशी केली असता तेथे असा प्रकार घडत असल्याचे आढळून आले आहे. येथील खत अनेक विक्रेत्यांकडे गेले असून दोन ट्रक खत इस्लामपूर शहरात पाठविल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
खतामधील बनवेगिरीमुळे मुख्य विक्रेते मालामाल, तर शेतकरी कंगाल होण्याच्या मार्गावर आहेत. शेतीची मशागत, मजुरी आणि खते, बियाण्यांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च वाढल्याने तो कर्जबाजारी झाला आहे. यातूनही अनेक प्रयोगशील शेतकरी मार्ग काढून चांगले उत्पन्न घेत आहेत. परंतु, बोगस बियाणे, खतांच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. कृषी विभाग यावर कडक कारवाई करू शकत नसल्यामुळे दिवसेंदिवस खताची बोगसगिरी वाढू लागली आहे.
सांगली शहराजवळच हाकेच्या अंतरावर असलेल्या कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये असाच प्रकार घडत आहे. येथे कालबाह्य खत नवीन पोत्यात भरून विक्री होत आहे. एका मुख्य खत वितरकाने २०१० मधील कालबाह्य शिल्लक खत सध्या नवीन पोत्यात भरून कंपनीचा हुबेहूब शिक्का मारून विकण्यास सुरुवात केली आहे. जुन्या खताची पोती फोडून ते खत एकत्र करून नवीन पोत्यात भरून त्याची विक्री होत आहे. शेतकऱ्यांची ही फसवणूक एका वाहनचालकाने पाहिली. त्यानंतर त्याने ‘लोकमत’कडे दूरध्वनीवरून या बोगसगिरीबद्दलची हकिकत सांगितली. संबंधित प्रकाराची चौकशी केल्यानंतर खतामधील बोगसगिरी होत असल्याचे अन्य वाहनचालकांनीही सांगितले.
गोदामात आनोळखी व्यक्तीला आतमध्ये सोडले जात नसल्याचे चालकांनी सांगीतले. तेथून भरून आलेल्या दुसऱ्या ट्रकचालकाला, कोणता माल असल्याचे विचारले असता, त्याने खत असून ते इस्लामपूरला घेऊन जात असल्याचे सांगितले. कोणत्या कंपनीचे आहे, असे विचारले असता, त्याने स्मितहास्य करीत बोलण्यास नकारा दिला आणि ट्रक पुढे घेऊन गेला. खत, बियाणे बोगसगिरी होऊ नये म्हणून कृषी विभागाने ११ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. परंतु, यापैकी एकाही पथकाचे कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू असलेल्या खताच्या बोगसगिरीकडे लक्ष कसे गेले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, कृषी विकास अधिकाऱ्यांना कुपवाडला रात्री भेट देऊन शोध सुरु केला आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Sell ​​out of unmarked new sapling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.