स्वाभिमानी, निर्भीड नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:24 IST2021-05-01T04:24:32+5:302021-05-01T04:24:32+5:30
आपल्या राजकीय आयुष्यात साहेबांनी पराभवाची तमा न बाळगता कायम पुढे चालत राहणे, त्याचबरोबर संघर्षामुळे परिणामांची चिंता कधी केली नाही. ...

स्वाभिमानी, निर्भीड नेतृत्व
आपल्या राजकीय आयुष्यात साहेबांनी पराभवाची तमा न बाळगता कायम पुढे चालत राहणे, त्याचबरोबर संघर्षामुळे परिणामांची चिंता कधी केली नाही. आपल्या स्वार्थापोटी नेत्यापुढे लाळघोटेपणा कधी केला नाही. हाच विचार त्यांनी आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांत रुजविला. म्हणूनच, त्यांचे कट्टर कार्यकर्ते साहेब हाच आमचा पक्ष असल्याचे ठासून सांगतात. त्यामुळे साहेबांच्या आतापर्यंतच्या राजकीय कालखंडात त्यांच्या गटात कित्येक कार्यकर्ते आले, कित्येक गेले त्याची तमा साहेबांनी कधी बाळगली नाही. जगताप साहेब यांचा स्वभाव मुळातच रोखठोक व स्पष्टवक्तेपणा असा असून वारकरी सांप्रदायाचा वारसा त्यांना लाभलेला अशी त्यांची राजकीय पार्श्वभूमी. अन्यायाविरुध्द लढण्यासाठी कोणाचाही मुलाहिजा न ठेवणारे साहेबांचे व्यक्तिमत्त्व तर आहेच शिवाय भोंदुगिरी, अंधश्रद्धेच्या विरुध्द त्यांनी कायम स्वतःची अशी वेगळी भूमिका अनेक सभांतून मांडली.
‘मऊ मेणाहुनी आम्ही विष्णूदास कठीण वज्रास भेदू ऐसे भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हानू काठी’
या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगानुसार स्वभाव असल्याने अन्यायाने वागणाऱ्या प्रस्थापितांच्या विरोधात कायम भूमिका घेतली. त्यामुळेच साहेबांनी स्वतःची अशी ठाम भूमिका मांडत तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने शासनाशी वेळोवेळी संघर्ष करत अनेक विकासाचे मुद्दे मांडले. मागासलेल्या दुष्काळी तालुक्यातील दबलेल्या जनतेमध्ये सातत्याने जनजागृती जगताप साहेबांनी केली. तालुक्यातील रस्ते, पाणी, वीज यासाठी संघर्ष तर सातत्याने केलाच, शिवाय १९८८ साली पहिला ऐतिहासिक मोर्चा काढला. त्या मोर्चाला ३७/३ कलम जारी केले गेले. त्याचबरोबर राजकीय वाटचालीत आजतागायत ३ वेळा पंचायत समितीवर वर्चस्व प्रस्थापित केले. शिवाय आमदारकीच्या कालावधीमध्ये तालुक्यातील अनेक रस्त्यांची दर्जोन्नती केली आहे. तालुक्यातील सर्व गावे डांबरी रस्त्याने जोडली. कर्नाटक व महाराष्ट्रातील सीमा भागातील अनेक रस्ते डांबरीकरण करून जोडले गेले. तर शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळण्यासाठी तालुक्यात जलसंधारणाला गती देत पूर्व भागातील बोर नदीवर १२ बंधारे बांधले. तर सिंगनहळ्ळी ओढ्यावर ५ बंधारे मंजूर केले. अशा पद्धतीने शेतीच्या पाण्यासाठी सिमेंट बंधाऱ्यांचे जाळे उभे केले. एवढेच नाही, तर म्हैसाळ योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणल्याने आज तालुक्यातील अनेक भागात बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जात आहे. तालुक्यातील पूर्व भागातील गावांना विस्तारित म्हैसाळ योजनाच फायदेशीर असून या योजनेस अंतिम मंजुरी मिळणे व योजना पूर्ण करणे हे साहेबांचे स्वप्न आहे. शिवाय, वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी ३३/११ ची वीज उपकेंद्र ५ ठिकाणी मंजूर केली. यामध्ये वाळेखिंडी, बसर्गी, उटगी, अंकले या गावांचा समावेश आहे.
साहेबांच्या राजकीय वाटचालीत त्यांना तालुक्यातील अनेक नेत्यांबरोबर संघर्ष करावा लागला. वयाच्या ७२ व्या वर्षीही त्यांचे राजकारण व समाजकारण अविरतपणे सुरू असून दुष्काळग्रस्त जनतेचे ते मोठे आशास्थान आहेत.
शब्दांकन : भागवत काटकर