ऊसक्षेत्र घटल्याने तोडणी मजुरांना यंदाचा हंगाम कडवटच!

By Admin | Updated: December 25, 2016 23:50 IST2016-12-25T23:50:24+5:302016-12-25T23:50:24+5:30

मजुरांच्या पालीतील व्यथा : ऊस उत्पादन घटल्याने ६0 टक्के उत्पन्न बुडाले; तीन महिन्यात गावी परतावे लागणार

This season due to the decline of sugarcane, the season is worried! | ऊसक्षेत्र घटल्याने तोडणी मजुरांना यंदाचा हंगाम कडवटच!

ऊसक्षेत्र घटल्याने तोडणी मजुरांना यंदाचा हंगाम कडवटच!

अविनाश कोळी ल्ल सांगली
कारखान्यांच्या धुराड्यांना यंदा घटलेल्या ऊसक्षेत्रानं लवकरच थंड करण्याचे गणित आखले असतानाच, हंगामाचा हा कडवटपणा आता ऊसतोडणी मजुरांच्या आयुष्यालाही चिकटला आहे. ६० टक्के उत्पन्नावर पाणी सोडून दरवर्षी सहा महिने मुक्कामाला येणाऱ्या मजुरांना आता तीन महिन्यांतच परतावे लागणार आहे.
सांगलीत वसंतदादा कारखान्याच्या पिछाडीस जवळपास पावणेतीनशे कुटुंबांनी पाली उभारल्या आहेत. उसाचे क्षेत्र घटल्याने मजुरांचे कामही कमी झाले आहे. पाच ते सहा महिन्यांत ज्यांच्या हाती लाख, सव्वालाख लागायचे, त्यांच्या हाती आता पन्नास हजार रुपये पडणेही मुश्किल झाले आहे. हंगामही लवकरच संपण्याची चिन्हे असल्याने यंदा जानेवारीच्या अखेरीस पाली उठून तांडे चालायला लागतील, अशी स्थिती आहे. मजुरांच्या पालींमध्ये यावर्षी घटलेल्या उत्पन्नामुळे चिंतेचा धूर पसरला आहे. हंगाम चांगला झाला नसल्याने वर्षभराचे त्यांचे अर्थचक्रही विस्कळीत होणार आहे.
अनेक मजुरांनी गावाकडे पतसंस्था, बॅँका आणि सावकारांकडून कर्ज काढलेले असते. कर्जाची परतफेडही या हंगामावरच बरीचशी अवलंबून असल्याने त्यांना आता चिंता वाटू लागली आहे. दुष्काळी गावातून आलेल्या या मजुरांना नेहमीच उसाचा हंगाम साथ देत असतो. यावेळी हंगामाने फार कमी साथ दिली. हंगाम उशिरा चालू होऊन लवकर संपणार आहे. तोडणी कमी झाल्याने वैरण घटली आणि वैरण घटल्याने रोजचे चलनही थांबले आहे. आर्थिक दुष्टचक्रात अडकलेला, हजारो मजुरांना चांगला वाटणारा हंगाम त्रासदायक वाटू लागला आहे.
यापूर्वी दराच्या आंदोलनाचा भडका झाल्यानंतरही मजुरांना काही वाटले नव्हते. दराचा तोडगा निघाल्यानंतर तरी परिस्थिती पूर्वपदावर येत होती. आता उत्पादनच नसल्याने परिस्थिती सुधारण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. धुराडे बंद पडताना चिंतेची काजळी आता त्यांच्या पालींवर पडणार आहे.

जीवनाचं चक्र...
एकवेळच्या स्वयंपाकात तीनवेळचा पोटोबा करून भल्या पहाटे फडात कष्टाचे गाणे गाणाऱ्या बीड जिल्ह्यातील ऊसतोडणी मजुरांच्या सांगलीतील पाचमाही मुक्कामातच त्यांच्या वर्षभराच्या जगण्याचे अर्थकारण दडले आहे. त्यांच्या जीवनाची चाकं साखरपट्ट्याशी बांधली गेली असली, तरी सव्वातीनशे किलोमीटरमधील त्यांची जगण्याची कसरत पिढ्यान् पिढ्या तशीच आहे.

Web Title: This season due to the decline of sugarcane, the season is worried!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.