मनसेतील वादावर राज ठाकरेंकडून पडदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:32 IST2021-02-17T04:32:14+5:302021-02-17T04:32:14+5:30
सांगली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सांगली जिल्ह्यातील पाच पदाधिकाऱ्यांनी अचानक राजीनामे दिल्याने याची दखल पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी घेतली. ...

मनसेतील वादावर राज ठाकरेंकडून पडदा
सांगली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सांगली जिल्ह्यातील पाच पदाधिकाऱ्यांनी अचानक राजीनामे दिल्याने याची दखल पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी घेतली. जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत मंगळवारी मुंबईत बैठक घेऊन त्यांनी समन्वयाने, एकसंधपणे काम करण्याचा सल्ला दिला.
सात वर्षांपासून रिक्त असलेले संपर्क अध्यक्षपद, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून होत असलेले दुर्लक्ष व अन्य कारणांमुळे सांगली जिल्ह्यातील पाच पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्षांकडे संयुक्तपणे राजीनामे सादर केले होते. पक्षात सामान्य कार्यकर्ता म्हणून राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले होते. यामुळे मनसेच्या वरिष्ठ नेत्यांमध्येही सांगलीतील परिस्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आली. जिल्ह्यात अस्तित्वासाठी झगडत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सक्रिय कार्यकर्त्यांची नाराजी परवडणारी नसल्याने त्याची दखल पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी घेतली.
सोमवारी व मंगळवारी दोन दिवस या पदाधिकाऱ्यांना त्यांनी वेळ दिला. सोमवारी सायंकाळी नाराज पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर जिल्हाध्यक्षांसह नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांनी मंगळवारी घेतली. यावेळी मनसेचे नेते शिरीष सावंत, ठाणे-पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, सांगलीचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, जिल्हा सचिव आशिष कोरी, जिल्हा उपाध्यक्ष संदीप टेंगले, महापालिका क्षेत्राध्यक्ष विनय पाटील, सांगली शहराध्यक्ष दयानंद मलपे, सागर चव्हाण आदी उपस्थित होते.
राज ठाकरे म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे, समन्वयाने यापुढेही काम करा. पक्ष कधीच कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करणार नाही. पक्षाचे पाठबळ असल्याने ताकदीने पक्षसंघटन वाढीसाठी प्रयत्न करावेत. आहे त्या पदांवर सर्वांनी काम करावे.