सांगलीचा पारा ४२.३ अंशावर
By Admin | Updated: May 19, 2016 00:23 IST2016-05-18T23:25:59+5:302016-05-19T00:23:42+5:30
अघोषित संचारबंदी : झळा असह्य
सांगलीचा पारा ४२.३ अंशावर
सांगली : जिल्ह्याच्या तापमानात वेगाने वाढ होत असून शेजारील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यापेक्षाही सांगली जिल्ह्याचे तापमान अधिक आहे. बुधवारी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४२.३ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. त्यामुळे दिवसभर उन्हाच्या तीव्र झळांमुळे अनेक महत्त्वाचे रस्ते ओस पडले होते. अघोषित संचारबंदीचेच चित्र अनेक ठिकाणी दिसून आले.
भारतीय हवामान खात्याच्या पुणे विभागाने मंगळवारी सांगलीचे तापमान ४२.३ इतके दर्शविले. आगामी चार दिवस उष्म्याची ही लाट कायम राहणार असल्याने शासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत. नागरिकांनाही उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने दुपारच्यावेळी रस्ते ओस पडू लागले आहेत.
सांगली, मिरज शहरातील अनेक रस्ते दुपारी एक ते चारपर्यंत शांत होते. विस्तारित विभागातील रस्त्यांवरही संचारबंदीसारखे चित्र होते. जिल्ह्यात यापूर्वी ६ मे १९९३ रोजी ४२.९ इतके विक्रमी तापमान नोंदले गेले होते. त्यापूर्वी १९७३ लासुद्धा तापमान ४३ अंश होते. मात्र १९९३ नंतर गेल्या २३ वर्षात कधीही पारा ४२ अंशावर गेला नव्हता. यावेळी हा पारा विक्रमाच्या जवळपास घुटमळत आहे. त्यामुळे लोकांना या तापमानाने हैराण केले आहे. (प्रतिनिधी)
चर्चा तापमानावर
वाढते तापमान आणि उन्हाच्या झळा हा आता जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी चर्चेचा विषय बनला आहे. हवामान खात्याच्या संकेतस्थळावर जाऊन तासागणिक तापमानाची माहिती घेणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.
पाण्याचे दुर्भीक्ष्य केवळ माणसांपुरतेच मर्यादित राहिलेले नाही. पशु-पक्ष्यांनाही याचे तीव्र चटके सोसावे लागत आहेत. पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटताना प्राणी-पक्ष्यांनाही मैलोन् मैल भटकंती करावी लागत आहे. सांगलीतील कावळ्यांची पोटाची चिंता स्मशानभूमीत संपत असली तरी, पाण्यासाठी त्यांना धडपडावे लागतेच. शहरातील एका सार्वजनिक नळावर बुधवारी अनेक मिनिटांच्या प्रयत्नानंतर दोन कावळ्यांची तहान भागली...
सांगाडे दुष्काळातले... : दुष्काळाची छाया गडद होत असताना, निष्पर्ण होणाऱ्या वृक्षांच्या सावल्या गायब होत आहेत. हिरवाई जाऊन झाडांचे सांगाडे उरताना, जनावरांची स्थितीही त्यांच्यासारखीच होताना दिसत आहे. मणेराजुरी येथील शेकोबा डोंगरावरील हे चित्रही तेच दर्शवित आहे.