सांगलीकरांनी बाप्पाला दिला भावपूर्ण निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:29 IST2021-09-21T04:29:20+5:302021-09-21T04:29:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : दहा दिवसांच्या आराधनेनंतर रविवारी सांगलीकरांनी आराध्य गणेशाला मनोभावे निरोप दिला. पुढच्या वर्षी लवकर येण्याचे ...

सांगलीकरांनी बाप्पाला दिला भावपूर्ण निरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दहा दिवसांच्या आराधनेनंतर रविवारी सांगलीकरांनी आराध्य गणेशाला मनोभावे निरोप दिला. पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत गणरायाचा निरोप घेतला. गणपती घाटावर रात्री साडेअकरापर्यंत विसर्जन सोहळा सुरू होता.
उत्सवाच्या अखेरच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्यासाठी कृष्णाकाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी होती. यंदा उत्सव दहा दिवसांचा असल्याने एक दिवस अगोदरच गणरायाने निरोप घेतला. कृष्णाकाठी महापालिकेने विसर्जन सोहळ्यासाठी तयारी केली होती. कृत्रिम कुंड, निर्माल्य संकलनासाठी कुंड, प्रकाश व्यवस्था, स्वच्छता, विसर्जनासाठी यांत्रिक बोटी आदी तयारी होते. दुपारपासूनच नदीकाठी गणेशभक्तांची गर्दी होऊ लागली. काही कुटुंबांनी बाप्पाची मूर्ती सजावटीसह विसर्जनासाठी आणली होती. अनेक कुटुंबांनी घाटावर एकत्रित आरती करत मूर्तींचे सामुदायिक विसर्जन केले. विघ्नहर्त्याला निरोप देण्यासाठी महिला मोठ्या संख्येने नदीकाठी आल्या होत्या.
मंडळांनीही मिरवणुका टाळून साधेपणाने विसर्जन सोहळा पार पाडला. एका वाहनातून चार ते सहा मंडळांनी मूर्ती आणल्या. वाद्यांचा गजर नसला तरी कार्यकर्त्यांचा बाप्पांचा जयघोष मात्र अखंड सुरू होता. पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषाने कृष्णाकाठ दुमदुमून गेला होता.
महापालिका क्षेत्रात महापालिकेने सहा कृत्रिम तलाव आणि २६ विसर्जन कुंड तयार केले होते. मूर्तीदान घेण्यासाठी २३ ठिकाणी केंद्रे उभी केली होती, तेथे १२६७ मूर्तींचे दान मिळाले. ३३१५ मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन झाले. ९४३२ मूर्तींचे कृत्रिम कुंडात विसर्जन झाले. याकामी स्वयंसेवी संस्थांनीही महापालिकेला सहकार्य केले.
चौकट
दृष्टिक्षेपात सोहळा
- अनंत चतुर्दशीला १५३ मंडळांनी केले विसर्जन.
- कृष्णा नदीत सुमारे साडेसात हजार मूर्तींचे विसर्जन.
- गणेशोत्सव कालावधीत महापालिका क्षेत्रात १२६७ मूर्तींचे दान.
- महापालिका क्षेत्रात १४६ टन निर्माल्य संकलित झाले.