सांगलीशी मुंडेंचा ३० वर्षांचा ऋणानुबंध संपला

By Admin | Updated: June 4, 2014 00:08 IST2014-06-04T00:07:26+5:302014-06-04T00:08:42+5:30

संकटसमयी धावले : कॉँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपची पाळेमुळे खोलवर रुजविण्यात मोठा वाटा

Sangliish Munde's 30-year lease ended | सांगलीशी मुंडेंचा ३० वर्षांचा ऋणानुबंध संपला

सांगलीशी मुंडेंचा ३० वर्षांचा ऋणानुबंध संपला

सांगली : केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने गेली ३० वर्षे सांगलीशी जोडला गेलेला ऋणानुबंध संपुष्टात आला. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपची पाळेमुळे खोलवर रुजविण्यात मुंडेंचा मोठा वाटा होता. मिरज दंगल, मौजे डिग्रजमध्ये शेतकर्‍यांना झालेली मारहाण, संभाजी भिडे यांना झालेली मारहाण असो अथवा महापूर, दुष्काळ, प्रत्येकवेळी मुंडे सांगलीच्या मदतीला धावले होते. जिल्ह्यातील नेत्यांइतकाच त्यांनीही हा जिल्हा पिंजून काढला होता. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील लोकांचा त्यांच्याशी स्नेह जडला होता. सांगली जिल्हा हा तसा काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, पण गेल्या दहा वर्षांत जिल्ह्यातील राजकीय चित्र पालटले. भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांचा जनाधार वाढला आहे. त्यात खर्‍याअर्थाने गोपीनाथ मुंडे यांचे योगदान मोठे आहे. १९८५ पासून मुंडे यांचा सांगली जिल्ह्याशी संबंध आला. भाजपच्या कार्यकारिणीचे पदाधिकारी म्हणून सांगलीत बैठकांसाठी ते येत असत. छोट्या-छोट्या बैठकांतून कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देण्याचे काम त्यांनी केले. जिल्ह्यात भाजपचा जनाधार फारच कमी होता. पण त्या काळातही मुंडेंनी दिलेल्या आत्मविश्वासाच्या बळावर पक्षाचे कार्यकर्ते राजकीय, सामाजिक जीवनात कार्यरत होते. १९९२ मध्ये मुंडे विरोधी पक्षनेते झाले आणि संपूर्ण जिल्हा त्यांना ओळखू लागला. सांगलीच्या पहिल्याच दौर्‍यात त्यांनी जिल्ह्यातील अनेक प्रश्नांना हात घातला. सांगलीचा शेरीनाला, शासकीय रुग्णालयातील अस्वच्छ कारभार, या शासकीय कामकाजाचा तेथे प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी पंचनामा केला. १९९५ मध्ये युती शासनाच्या काळात ते उपमुख्यमंत्री झाले. त्याबद्दल सांगलीत त्यांचा नागरी सत्कारही करण्यात आला. तेव्हा मुंडे यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली होती. तत्पूर्वी सांगलीच्या राजकारणात राजकीय भूकंप झाला होता. जिल्ह्यात संपतराव देशमुख, अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक, राजेंद्रअण्णा देशमुख, मधुकर कांबळे असे पाच अपक्ष आमदार निवडून आले होते. युतीचे सरकार स्थापन करताना या पाच अपक्षांचा टेकू फारच महत्त्वाचा होता. त्यात मुंडेंनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडत या पाच अपक्ष आमदारांना युतीत आणले. घोरपडे, नाईक यांना राज्यमंत्रीपदही दिले. त्यानंतर खर्‍याअर्थाने मुंडेंचा या जिल्ह्यातील वावर वाढला. जिल्ह्याच्या दुष्काळी भागात कृष्णेचे पाणी पोहोचविण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली. महामंडळ स्थापन करण्यात मुंडेंचा मोठा वाटा होता. जिल्हा दौर्‍यावर आल्यानंतर टेंभू, ताकारी, म्हैसाळ या सिंचन योजनांबाबत ते सतत माहिती घेत आणि सभा, पत्रकार बैठकांतून ते अधिकारवाणीने बोलत. १९९९ मध्ये ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नावर मुंडे यांनी नांद्रे ते वसगडे अशी मोटारसायकल रॅली काढली होती. केंद्र व राज्यात भाजपचे सरकार आल्यास ऊस उत्पादकांचे प्रश्न सोडविण्याची ग्वाहीही त्यांनी जाहीर सभेत दिली होती. सांगलीत संघर्ष यात्रा, जाहीर सभा, मोर्चे, आंदोलनाचे निमंत्रण त्यांनी कधीही नाकारले नाही. त्यांचा जनतेशी असलेला स्नेह दिवसेंदिवस वाढतच गेला. या ऋणानुबंधातून सांगलीत २१ जानेवारी २०११ रोजी मुंडे यांचा एकसष्टीनिमित्त नागरी सत्कार झाला. त्याला खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. मौजे डिग्रज येथे पोलिसांनी शेतकर्‍यांना मध्यरात्रीच्या सुमारास अमानुष मारहाण केली होती. या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले. गोपीनाथ मुंडे यांनी डिग्रजला भेट देऊन हा प्रश्न विधिमंडळातही लावून धरला होता. जत तालुक्यातील आसंगी तुर्क येथील जळीत हत्याकांडावेळीही तातडीने भेट देणारे मुंडेच होते. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना सांगलीत पोलिसांनी मारहाण केली. या घटनेनंतर सांगलीत दंगल उसळली होती. मुंडेंना याची माहिती मिळताच ते तडक मुंबईहून सांगलीत आले होते. त्यांनी संभाजी भिडे यांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावाही घेतला होता. मिरज दंगलीवेळीही ते सांगलीकडे येण्यास निघाले होते. पण मुंबईतच त्यांना पोलिसांनी अडविले होते. २००५-०६ च्या महापुरातही मुंडे यांनी सांगलीच्या जनतेला आधार देण्याचे काम केले होते. अशा एक ना अनेक घटनांत मुंडे नेहमीच सांगलीच्या मदतीला धावले होते. सांगली जिल्ह्याच्या भौगोलिक व राजकीय स्थितीची मुंडे यांना चांगलीच माहिती होती. जनतेची नाडी ओळखून राजकीय लवचिकता स्वीकारण्याची मानसिकता त्यांच्याकडे असल्यानेच जिल्ह्यात भाजपचे बळ वाढले. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत केवळ एक आमदार असलेल्या भाजपला २००९ च्या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून जनतेने स्वीकारले, ते मुंडे यांच्या प्रयत्नामुळेच! आमदार संभाजी पवार यांना भाजपमध्ये आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. प्रकाश शेंडगे यांना त्यांनी ऐनवेळी जत विधानसभा मतदारसंघातून रिंंगणात उतरविले. आ. सुरेश खाडे, दीपक शिंदे-म्हैसाळकर यांनाही बळ दिले. त्यांच्या निधनाने ३० वर्षांचा ऋणानुबंध संपुष्टात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Sangliish Munde's 30-year lease ended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.