सांगलीत विद्युत उपकरणे जळाली
By Admin | Updated: August 31, 2014 23:36 IST2014-08-31T22:36:33+5:302014-08-31T23:36:18+5:30
नागरिकांमध्ये भीती : घरावर उच्च दाबाची केबल पडली

सांगलीत विद्युत उपकरणे जळाली
सांगली : शहरातील शंभरफुटी रस्त्यावरील साई मंदिरजवळील पाच घरातील विद्युत उपकरणे जळाली आहेत. हा प्रकार शार्टसर्किटने झाला की, अतिउच्च दाबाच्या वीज प्रवाहाने झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. आज (रविवार) सायंकाळी ही घटना घडली.
अश्विनकुमार वसंत वरुटे, मिलींद राजाराम जाधव यांच्यासह पाच घरातील टीव्ही, फॅन, फ्रीज ही उपकरणे जळाली आहेत. खिडकीच्या काचाही फुटल्या आहेत. सायंकाळी पाच वाजता अचानक घरातील विद्युत उपकरणातून धूर येत होता. स्फोटासारखा आवाज आल्याने घरातील लोक भितीने बाहेर पडले. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले होते. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली. तथापि उपकरणे जळून खाक झाली होती. घरात अन्य कोणत्याही साहित्याला आग लागली नव्हती.
महावितणचे पथकही दाखल झाले होते. त्यानंतर अग्निशमनचे जवान निघून गेले. महावितणच्या पथकाने परिसरातील वीज पुरवठा तातडीने बंद केला होता. त्यानंतर पंचनामा करण्यात आला होता. पाच घरात हे प्रकार घडले असले तरी त्यांच्या घराच्या छतावर उच्च दाबाची केबल वायरही पडली होती. रात्री उशिरापर्यंत या केबल वायर काढण्याचे काम सुरु होते. हा प्रकार शॉर्टसर्किटने झाला की, अतिउच्च दाबाच्या वीज प्रवाहाने झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे सांगण्यात आले.
या परिसरातून टीव्हीची केबल वायर गेली आहे. दुपारी केबल वायर जोडण्याचे काम सुरु होते. त्यावेळी केबल वायरचा स्पर्श मुख्य विजेच्या तारेशी झाल्याने ही घटना घडली असल्याची चर्चा सुरु होती. लोकांच्या घराच्या छतावर केबल वायरही पडली होती.
दरम्यान शहर पोलिसांनीही घटनास्थळी भेट दिली. ज्यांच्या घरात हे प्रकार घडले, त्यांना तक्रार करणार आहे का? अशी विचारणा केली. तथापि त्यांनी तक्रार देण्यास नकार दिला. यामुळे गुन्हा दाखल झाला नाही. पाचही घरातील विद्युत उपकरणे जळून अंदाचे साठ ते सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. (प्रतिनिधी)
वर्षभरातील चौथी घटना
शंभरफुटी रस्त्यावरील लोकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळाल्याची गेल्या वर्षभरातील ही चौथी घटना आहे. सातत्याने या परिसरातच असे प्रकार घडत आहेत. सहा महिन्यापूर्वी दहा ते बारा घरांतील उपकरणे जळून खाक झाली होती. यामध्ये पाच लाखांचे नुकसान झाले होते. हा प्रकार अतिउच्च दाबाच्या वीजप्रवाहामुळे झाल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र हे प्रकार रोखण्यासाठी महावितरण कंपनीकडून कोणतेही प्रयत्न होत नसल्याची तक्रार रहिवाशांनी केली.