सांगली : चारशे हेक्टर पिकांवर गोगलगार्इंचा हल्ला
By Admin | Updated: October 2, 2014 23:48 IST2014-10-02T23:36:21+5:302014-10-02T23:48:20+5:30
शेतकऱ्यांना फटका : विशाखापट्टणममधून दीडशे किलो औषध उपलब्ध

सांगली : चारशे हेक्टर पिकांवर गोगलगार्इंचा हल्ला
सांगली : मिरज तालुक्यातील चौदा गावांमधील ३९५ हेक्टर क्षेत्रावरील ज्वारी, भुईमूग, ढबू मिरची, ऊस, द्राक्ष पिकांवर गोगलगार्इंनी हल्ला चढविला आहे. शेतकरी हवालदिल झाला असून पशुधनाच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. गोगलगाय हाताने उचलून टाकल्यास हाताला आग होणे, ताप येणे, मळमळून उलट्या होणे असा त्रास सुरू झाला आहे. दरम्यान, जिल्हा परिषद कृषी विभागाने विशाखापट्टणम येथून गोगलगार्इंचा बंदोबस्त करण्यासाठी मागविलेले मेटल डी हाईड हे औषध ५० टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे. परंतु, तेथून पुरेसे औषध उपलब्ध न झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना औषध उपलब्ध झाले नसल्याच्या तक्रारी आहेत.
गोगलगाई पिकांची कोवळी पाने, फांद्या, कळ्या खात असून पिकांचे नुकसान करीत आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. चौदा गावांतील ३९५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांमध्ये गोगलगार्इंचा प्रादुर्भाव झाल्याची शासकीय आकडेवारी आहे. प्रत्यक्षात हे क्षेत्र जास्त असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, अधिकाऱ्यांनी विशाखापट्टणम येथून औषध मागविले आहे. पन्नास टक्के अनुदानावर या औषधाचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती आर. जे. भोसले यांनी दिली. (प्रतिनिधी)