महागाईबद्दलच्या घुसमटीला सांगलीत कृती समितीने दिले व्यासपीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:36 IST2021-06-16T04:36:01+5:302021-06-16T04:36:01+5:30
सांगलीत महागाईविरोधात लोकांना भावना व्यक्त करण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीतर्फे डबे वितरीत करण्यात आले. यावेळी सतीश साखळकर, पृथ्वीराज पवार, पूजा ...

महागाईबद्दलच्या घुसमटीला सांगलीत कृती समितीने दिले व्यासपीठ
सांगलीत महागाईविरोधात लोकांना भावना व्यक्त करण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीतर्फे डबे वितरीत करण्यात आले. यावेळी सतीश साखळकर, पृथ्वीराज पवार, पूजा पाटील, संजय पाटील, आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वेगाने वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्यांची होरपळ होत आहे. त्यांच्या घुसमटीला व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे काम सांगलीत सर्वपक्षीय कृती समितीने सोमवारी केले. महागाईविरोधात भावना व्यक्त करण्यासाठी शहरभरात पेट्या वितरीत केल्या. नागरिकांनी आपल्या भावना लिहून डब्यात टाकण्याचे आवाहन केले.
येथील मारुती चौकातून सकाळी ५०हून अधिक डबे वितरीत करण्यात आले. पान टपऱ्या, हॉटेल्स, रिक्षा थांबे, किराणा दुकाने, पक्ष व संघटनांची कार्यालये आदी ठिकाणी ते ठेवण्यात आले. महागाई संदर्भातील भावना लोकांनी लिहून डब्यात टाकण्याचे आवाहन समितीने केले. कविता, शेरोशायरी, चारोळ्या यासह सामान्य शब्दांतही भावना व्यक्त करता येतील. या उपक्रमाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.
संयोजक सतीश साखळकर यांनी सांगितले की, पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल या जीवनावश्यक बाबींची वर्षभरापासून सतत दरवाढ सुरु आहे. लॉकडाऊनमध्ये रोजगार आणि उत्पन्नाचे स्रोत ठप्प झाले असताना महागाईचा आगडोंब उसळला आहे. महागाईविरोधात लोकांच्या भावना तीव्र आहेत. त्या जाणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.
पृथ्वीराज पवार म्हणाले की, महागाईमुळे लोकांचे जगणे असह्य झाले आहे. उमेश देशमुख म्हणाले की, केंद्र सरकार लॉकडाऊनमध्ये मदत करण्याऐवजी लोकांच्या संकटात भर घालत आहे. डॉ. संजय पाटील म्हणाले की, लोकांच्या सुख-दु:खांशी सरकारला काहीही देणेघेणे नसल्याचे स्पष्ट होत आहे.
यावेळी पूजा पाटील, बटू बावडेकर, युनूस शेख, चंद्रकांत सूर्यवंशी, राहुल पाटील, संभाजी पोळ, लालू मेस्त्री, कामरान सय्यद, असिफ बावा, प्रदीप कांबळे, आनंद देसाई, आनंद कांबळे हेदेखील उपस्थित होते.
चौकट
केंद्राला भावना कळविणार
कृती समितीने सांगितले की, महागाईविरोधात लोकांनी व्यक्त केलेल्या भावना केंद्र सरकारला कळवणार आहोत. काही महत्त्वाच्या व विशेष प्रकारे व्यक्त झालेल्या भावना डिजिटल फलकांद्वारे शहरात ठिकठिकाणी लावल्या जातील.