वाळू उपशाने वारणाकाठ खचला
By Admin | Updated: June 10, 2015 00:31 IST2015-06-09T22:44:52+5:302015-06-10T00:31:11+5:30
नुकसानीने शेतकरी हादरला : पात्राची रुंदी वाढण्याचा धोका

वाळू उपशाने वारणाकाठ खचला
सागाव : वारणा नदीमध्ये सुरु असणाऱ्या वाळू उपशामुळे नदीकाठ खचू लागला असून, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतीच्या होत असलेल्या नुकसानीमुळे वारणाकाठचा शेतकरी हादरला आहे. नदीकाठ वाचविण्यासाठी वाळू उपसा बंद करावा, अशी मागणी शेतकरी व नागरिकांतून होत आहे.
वारणा नदीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतून नदी वाहते. दोन्ही जिल्ह्यांकडून वाळूचा ठेका दिला जात आहे. वाळू ठेकेदार नियमांना बगल देऊन वाळू उपसा करतात. जी जागा त्यांना ठरवून दिली जाते, त्याव्यतिरिक्त ज्या ठिकाणी सखल भाग मिळेल व वाळू चांगली मिळेल, तेथे प्रमाणापेक्षा जास्त यंत्रामार्फत वाळू उपसा करतात. अमर्याद वाळू उपशामुळे नदीकाठचा थर तुटत असून मोठ्या झाडांच्या व झुडपांच्या मुळ्यादेखील मोकळ्या होत आहेत. परिणामी झाडांसह सर्व भाग नदीपात्रात जात आहे.
पुनवत-शिराळे खुर्द येथे वाळू उपशाचा शेतकऱ्यांना त्रास होत आहे. वाळू ठेकेदार सर्व यंत्रणा शेतकऱ्यांच्या शेतामधूनच हलवत आहेत. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. पाणंद रस्ते देखील अवजड वाहनांमुळे खचले आहे. त्याचबरोबर गेल्या आठवड्यात सागाव येथे थेरगाव पाणवठा येथील नदीकाठ खचून सहा विद्युत मोठी पाण्यात गेल्या. याठिकाणची मोठी झाडेही नदीपात्रात गेली आहेत. वारणा नदीपात्रातील वाळू उपसा भविष्यात असाच सुरु राहिल्यास नदीकाठ खचण्याचे प्रमाण अधिकच वाढणार आहे. त्याचबरोबर पात्राची रुंदी देखील वाढणार आहे. या ठिकाणचा वाळू उपसा थांबवावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. (वार्ताहर)
झाडांबरोबर मातीही...
शासनाच्या धोरणानुसार नियम व अटी घालून वाळूचे ठेके दिले जात असले तरी, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होते. सध्या सुरू असलेल्या अमर्याद वाळू उपशामुळे नदीकाठचा थर तुटत असून मोठ्या झाडांच्या व झुडपांच्या मुळ्यादेखील मोकळ्या होत आहेत. परिणामी झाडांसह काठालगतची मातीही नदीपात्रात वाहून जात आहे. वारणा नदीपात्रातील वाळू उपसा भविष्यात असाच सुरु राहिल्यास नदीकाठ खचण्याचे प्रमाण अधिकच वाढणार आहे. परिणामी वारणा नदीकाठची जमीन नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे.