क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प रखडला
By Admin | Updated: December 17, 2014 23:01 IST2014-12-17T22:37:22+5:302014-12-17T23:01:37+5:30
कसबे डिग्रजमधील स्थिती : ठेकेदाराची मनमानी; जलसंपदा अधिकाऱ्याचे दुर्लक्ष

क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प रखडला
सोमनाथ डवरी- कसबे डिग्रज -राज्यातील पायलट प्रकल्प म्हणून कसबे डिग्रजमध्ये १०६५ हेक्टरचा सच्छिद्र निचरा प्रणाली क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प सुरू आहे. खा. राजू शेट्टी आणि तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्या प्रयत्नातून राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून दोन कोटी दहा लाख रुपये सुधारित कामासाठी मंजूर झाले आहेत. या कामांत मुख्य चरीचे काम ठेकेदारांच्या मनमानीने सुरू होते. तसेच प्रत्येक वेळी नवनवीन येणारे जलसंपदा विभागाचे अधिकारी ‘टाईमपास’ करीत हेतुपुरस्सर काम लांबवत असल्याची चर्चा सुरू आहे.
२००४-२००५ मध्ये १०६५ हेक्टरचा प्रकल्प मंजूर झाला होता. त्यापैकी ५८७ हेक्टरचे सच्छिद्र निचरा प्रणाली पूर्ण करण्यात आली आहे. त्याठिकाणी काही शेतकरी पिके घेत आहेत. उर्वरित ४७८ हेक्टरचे काम बाकी आहे. हे काम करण्यासाठी आणि सुधारित प्रकल्पासाठी शासनाचा निधी मंजूर आहे. सुधारित काम करताना सच्छिद्र निचरा प्रणालीच्या पाईप वाढविणे, ‘मुख्य चरींची’ संख्या वाढविणे, खोली वाढविणे, दगडी पिचिंग करणे आवश्यक ठिकाणी सी डी वर्क करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे सच्छिद्र पाईपमधून क्षारयुक्त पाण्याचा लवकर निचरा होऊन शिवारात लवकर सुधारणा होईल.
पण अनावश्यक ठिकाणी सी डी वर्क का आहेत, त्याचप्रमाणे विकसित भागातील मुख्य चरीची देखभाल दुरुस्ती, जी ती संस्था करीत आहे, पण किरकोळ कामासाठी कंत्राटदार-अधिकारी संगनमताने साफसफाई, काटेरी झुडपे पाणकणीस काढण्यासाठी लाखोचा खर्च दाखवत आहेत. ठेकेदार रक्कम अनावश्यक ठिकाणी रात्री-अपरात्री काम करताना हे काम सरपंच आणि शेतकऱ्यांनी बंद पाडले होते. चरखुदाईमध्ये ठेकेदाराची मनमानी सुरू असल्याचे दिसत आहे.
पाटबंधारे विभागातील अनेक अधिकारी हे काम टाळण्यासाठी प्रयत्न करतात, असे पीडित शेतकऱ्यांचे मत आहे. अधिकारी स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी ठेकेदाराची मनमानी खपवून घेत आहेत. गेले कित्येक दिवस काम रखडले आहे. त्याबाबत माहिती अधिकाराचा वापर करून पुरेशी माहिती घ्यावी लागत आहे.
पूर्वीच्या मंजूर निधीतील सुमारे २ कोटी २० लाख आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील २ कोटी १० लाख असा निधी उपलब्ध आहे.
त्याचप्रमाणे शेतकरी हिश्श्याचे सुमारे २० लाख रुपये ६-७ वर्षांपूर्वी आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील २ कोटी २० लाख असा निधी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे शेतकरी हिश्श्याचे सुमारे २० लाख रुपये ६-७ वर्षांपूर्वी भरले आहेत; पण काम जाणीवपूर्वक टाळले जात आहे. लाखो रुपयांची बिले अधिकारी-ठेकेदार संगनमताने उकळत आहेत. हे काम तात्काळ सुरू करावे, नकाशाप्रमाणे नियमित दर्जेदार काम व्हावे, असे क्षारपडग्रस्तांचे मत आहे. या कामात खा. राजू शेट्टी व आ. जयंत पाटील यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
अधिकारी-ठेकेदारांचे संगनमत
पाटबंधारे विभागातील अनेक अधिकारी हे काम टाळण्यासाठी प्रयत्न करतात, असे पीडित शेतकऱ्यांचे मत आहे. शेतकरी हिश्श्याचे सुमारे २० लाख रुपये ६-७ वर्षांपूर्वी भरले आहेत; पण काम जाणीवपूर्वक टाळले जात आहे. तसेच लाखो रुपयांची बिले अधिकारी-ठेकेदार संगनमताने उकळत आहेत, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.