युवा सरपंचांच्या कारभाराचा बोजवारा
By Admin | Updated: May 26, 2014 01:16 IST2014-05-26T00:43:53+5:302014-05-26T01:16:40+5:30
कामेरीतील चित्र : पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

युवा सरपंचांच्या कारभाराचा बोजवारा
अशोक पाटील, इस्लामपूर : कामेरी (ता. वाळवा) येथील राष्ट्रवादीचे माजी सरपंच, विद्यमान जि. प. सदस्य रणजित पाटील आणि काँग्रेसचे माजी सरपंच जयराज पाटील या दोघांनीही एकत्रित येऊन केलेल्या विकासकामांचा बोजवारा उडाला आहे. भारत निर्माण पाणी योजनेच्या कामाचे तीनतेरा वाजले आहेत. गेल्या १२ वर्षापासून शेतीसाठी असणार्या पाणी पुरवठा योजनेचे पाणी कामेरी ग्रामस्थांना पाजले जात होते. आता ते पाणी अशुध्द व मळीमिश्रित असल्याचे कारण दाखवत जयराज पाटील यांनी हे पाणी ग्रामस्थांना देण्यास अटकाव केला आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून कामेरी ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या दोन युवा माजी सरपंचांनी ग्रामपंचायतीचा गाडा एकदिलाने चालवला होता. विकासकामातून भारत निर्माण योजनेच्या कामाला गतीही आणली होती. भारत निर्माण योजनेचे काम चांगले व्हावे यासाठी ग्रामसभेत ठराव करुन एस. आर. पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. परंतु रणजित पाटील आणि जयराज पाटील यांनी एकत्र बसून ठराव बदलला व अध्यक्षपदावरुन एस. आर. पाटील यांना काढून टाकले. याचा जाबही शिवसेनेचे दि. बा. पाटील यांनी विचारला होता. तत्कालीन सरपंच जयराज पाटील यांनी गाजावाजा करुन भारत निर्माण योजनेचे पाणी गावाला मिळावे यासाठी उद्घाटन सोहळा करुन योजनेचे पाणी विहिरीतही सोडले. परंतु निकृष्ट कामे, कमी दाबाच्या विद्युत मोटारी यामुळे ही योजना फोल ठरली. त्यानंतर ही योजना ठप्प झाली. या योजनेचे लाखो रुपयांचे वीज बल थकित आहे. त्यामुळे पुन्हा शेतीसाठी असणार्या पाणी पुरवठा योजनेतील पाणी कामेरी ग्रामस्थांना प्यावे लागले. गेल्या १२ वर्षात ग्रामस्थांनी हेच पाणी पिऊन दिवस काढले. त्यावेळी याचा त्रास कोणालाही झाला नाही. आता मात्र राजकीय परिस्थिती बदलताच हेच पाणी मळीमिश्रित व दूषित येत असल्याचा आरोप जयराज पाटील करत असून पाणी सोडण्याला मज्जाव केला आहे. याचाच परिणाम म्हणून ग्रामस्थांना गेल्या ५ दिवसांपासून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कामेरीतील राजकीय कारकीर्द पाहता, हे युवक एकमेकांविरुध्द उभे ठाकले होते, तर लोकसभा निवडणुकीत या दोघांनी आघाडीचा धर्म पाळून आवाडेंचा प्रचार केला. परंतु कामेरी गावातूनही शेट्टींनाच मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे गाव वेठीस धरण्याचा या दोन्ही युवा नेत्यांना अधिकार काय? असा सवाल ग्रामस्थांतून होत असून तीव्र संताप व्यक्त होत आहे.