साखरेच्या दरात ३00 रुपयांनी घसरण
By Admin | Updated: September 6, 2016 23:46 IST2016-09-06T23:17:13+5:302016-09-06T23:46:14+5:30
कोठ्याच्या बंधनाने साखर उद्योगात अस्वस्थता : २७00 ते २८00 पर्यंत दर कोसळण्याची शक्यता

साखरेच्या दरात ३00 रुपयांनी घसरण
प्रकाश पाटील -- कोपार्डे --हंगाम २0१५-१६ मध्ये देशात साखरेचे बंपर उत्पादन झाले. यामुळे साखरेचे दर १९00 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरले. केंद्राने साखर उद्योग अडचणीत येऊ नये म्हणून साखर निर्यातीचे धोरण जाहीर केले आणि साखरेचे दर वाढू लागले. साखरेचे एक्स फॅक्टरी दर प्रतिक्विंटल ३५00 ते ३८00 वर पोहोचले असताना शासनाने व्यापाऱ्यांबरोबर कारखान्यांवरही साखर साठ्याबाबत बंधन आणल्याने साखरेच्या दरात ३00 ते ४00 रुपये प्रतिक्विंटल घसरण झाली आहे.
गतवर्षी दुष्काळाला राज्याला सामोरे जावे लागले. पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे शेतीच्या सिंचनासाठीच्या पाण्यावर उपसाबंदी लावली. यामुळे या हंगामात उसाचे उत्पादन घटणार असल्याने साखर उत्पादनही घटणार आहे. याचबरोबर शासनाने साखरेचे दर स्थिर राहावेत व साखर कारखान्यांना उत्पादन खर्चाएवढा दर मिळावा म्हणून साखरेच्या निर्यातीला प्रोत्साहनपर अनुदानही जाहीर केले. या सर्वांचा परिणाम साखरेचे दर जानेवारी २0१६ पासून वाढू लागले. आॅक्टोबर-नोव्हेंबर २0१५ मध्ये १९00 रुपये प्रतिक्विंटल असणारे साखरेचे दर चार दिवसांपूर्वी ३५00 ते ३८00 रुपये होते; पण केंद्र शासनाने हे दर आणखी वाढू नयेत म्हणून व्यापाऱ्यांबरोबर साखर कारखान्यांच्या साखरसाठ्यावरही नियंत्रण आणले आहे. साखर कारखान्यांकडे सप्टेंबर महिन्यात ३४ टक्के, तर आॅक्टोबर महिन्यात २७ टक्क्यांवर साठा असता कामा नये, असे निर्बंध करण्याचे जाहीर करताच साखरेच्या दरात दोन दिवसांत प्रचंड घसरण झाली.
चार दिवसांत ज्या-ज्या साखर कारखान्यांची साखर विक्री टेंडर झाली, त्यांची साखर ३१00 ते ३२00 रुपये विक्री करण्याचे धोरण स्वीकारले. यामुळे कारखान्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
येत्या काही दिवसांत हाच दर
२७00 ते २८00 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली येण्याची शक्यता साखर उद्योगातून वर्तविण्यात येत आहे. यामुळे पुन्हा एकदा धरसोड धोरणांचा बळी साखर उद्योग ठरणार असल्याच्या प्रतिक्रिया तज्ज्ञांनी व्यक्त केल्या आहेत.
बाजारात आजही साखर ४0 ते ४२ रुपये किलो
केंद्र शासन जनतेला साखरेच्या दराचा त्रास होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तू कायद्याचा वापर करून दर नियंत्रणात ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न क रते; मात्र याचा तोटा कारखाने व जनतेलाच जास्त होताना दिसतो.
सध्या कारखान्यांना मिळणारा दर व जनतेला मिळणाऱ्या घाऊक बाजारातील साखरेच्या दरात किमान पाच ते सहा रुपयांचा फरक आहे.
सध्या कारखानदारांना ३१00 ते ३२00 रुपये दराने साखर दर मिळत असताना बाजारातील साखरेचे दर मात्र कमी होताना दिसत नाहीत. याचा फायदा व्यापारीच उठवत असल्याचे चित्र दिसते.