‘सह्याद्री’च्या निवडणुकीत कडेगावची भूमिका निर्णायक
By Admin | Updated: March 13, 2015 23:57 IST2015-03-13T23:01:27+5:302015-03-13T23:57:05+5:30
बाळासाहेब पाटील यांना आव्हान : लालासाहेब यादव यांच्याकडे विरोधकांचे नेतृत्व

‘सह्याद्री’च्या निवडणुकीत कडेगावची भूमिका निर्णायक
रजाअली पीरजादे - शाळगाव : कऱ्हाड तालुक्यातील सह्याद्री साखर कारखाना राजकीय अड्डा बनल्याची टीका विरोधी पॅनेलचे नेते कडेपूरचे लालासाहेब यादव यांनी केली असून, सत्ताधारी आ. बाळासाहेब पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. सत्ताधाऱ्यांकडून कडेगाव तालुक्याला उमेदवारी देण्यात आलेली नाही. यादव यांच्याकडे विरोधकांनी नेतृत्व दिल्याने सह्याद्रीच्या फडात कडेगावची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत कदम बंधू काय भूमिका घेणार, यालाही मोठे महत्त्व आहे. सह्याद्री कारखान्याच्या कार्यक्षेत्रात कडेगाव तालुक्याचा समावेश होतो. या तालुक्यातील कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते बबनराव ऊर्फ भाऊसाहेब यादव गेली अनेक वर्षे कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत. यावेळी मात्र सत्ताधारी गटाने या तालुक्यातून कोणालाही संधी दिलेली नाही. दुसऱ्या बाजूला विरोधी पॅनेलचे नेते लालासाहेब यादव यांचे पुत्र जयदीप यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.सह्याद्री कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष पी. डी. पाटील यांना सर्वप्रथम लालासाहेब यादव यांनी विरोध केला. तेव्हापासून आजअखेर यादव आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. विरोधकांच्या पॅनेलला ज्येष्ठ नेते आ. विलासराव पाटील-उंडाळकरांचा पाठिंबा मिळाला आहे, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दक्षिण कऱ्हाडमधील गट शांत आहे. उंडाळकर यांना मानणारे कऱ्हाड पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठल जाधव, मसूरचे वसंतराव जगदाळे यांची उमेदवारी विरोधी गटातून आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढली आहे. दुसरीकडे विरोधक बेरजेचे राजकारण करत आहेत. कऱ्हाड उत्तरमधून आ. पाटील यांना विधानसभा निवडणुकीत थेट आव्हान देणारे कॉँग्रेसचे नेते धैर्यशील कदम व मनोज घोरपडे विरोधी पॅनेलबरोबर आहेत.
खटाव तालुक्यातून धैर्यशील कदम व साताऱ्यामधून घोरपडे यांचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. कडेगावमधून जयदीप यादव उमेदवार आहेत. त्यामुळे आजची परिस्थिती पाहता विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली असल्याचे चित्र आहे.
मागील दोन निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. त्यावेळी राजकीय परिस्थिती वेगळी होती. आताची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे या निवडणुकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
बदलत्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत. असे असले तरी सध्याची साखर कारखानदारी राष्ट्रवादीच्या हातातच रहावी म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार प्रयत्नशील आहेत. या निवडणुकीत ते अप्रत्यक्ष भाग घेतील, यात कुणालाही शंका नाही. पवार कऱ्हाड दौऱ्यावर येणार असून, त्यावेळी या निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी कॉँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये समझोता एक्स्प्रेस धावण्याची शक्यता आहे. तसे झाले तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम हे काय भूमिका घेणार, याला विशेष महत्त्व राहणार आहे.
कडेगाव तालुक्याने नेहमीच सत्ताधारी गटाला मदत केली आहे. परंतु प्रत्येकवेळी सत्ताधारी गटातून कडेगावचा उमेदवार असे. अनेक वर्षे सत्ताधारी गटाने कडेगावला उपाध्यक्षपद दिले आहे. परंतु यंदा कडेगावला डावलण्यात आले आहे. त्यामुळे यावेळचे चित्र बदलण्याची शक्यता असून, कडेगावची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
पी. डी. पाटील साहेब कारखान्याचे अध्यक्ष असताना चित्र वेगळे होते. मागील दोन निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. आता मात्र सभासदांना बदल हवा आहे आणि यावेळी बदल झालेला दिसून येईल.
- लालासाहेब यादव