पूरग्रस्तांच्या अनुदानासाठी उद्या घंटानाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:32 IST2021-09-14T04:32:20+5:302021-09-14T04:32:20+5:30
सांगली : जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना अद्याप राज्य शासनाकडून कसलीही मदत मिळालेली नाही. नागरिकांना सानुग्रह अनुदान, रेशनिंगवरील धान्य, व्यापारी, शेतकऱ्यांना ...

पूरग्रस्तांच्या अनुदानासाठी उद्या घंटानाद
सांगली : जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना अद्याप राज्य शासनाकडून कसलीही मदत मिळालेली नाही. नागरिकांना सानुग्रह अनुदान, रेशनिंगवरील धान्य, व्यापारी, शेतकऱ्यांना भरपाईपोटी एक रुपयाचीही मदत झालेली नाही. शासनाने तातडीने मदत द्यावी, यासाठी बुधवारी गणरायाला घंटानाद करून साकडे घातले जाणार असल्याचे सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांनी सोमवारी सांगितले.
सर्वपक्षीय कृती समितीची ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीला माजी आ. नितीनराजे शिंदे, पृथ्वीराज पवार, महेश खराडे, उमेश देशमुख, अश्रफ वांकर, राजकुमार राठोड, विकास मगदूम, डॉ. संजय पाटील, महेश पाटील, प्रदीप कांबळे, आनंद देसाई, रेखा पाटील, राहुल पाटील, अविनाश जाधव, अभिमन्यू भोसले, चंद्रकांत सूर्यवंशी, सॅमसन तिवडे, आकाश तिवडे आदी उपस्थित होते.
साखळकर म्हणाले की, सांगली शहरासह जिल्ह्याला जुलै महिन्यात महापुराचा फटका बसला. लाखो नागरिकांना स्थलांतर करावे लागले. व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शासनाने पूरग्रस्त नागरिकांना दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली; पण आता दीड महिना लोटला तरी एक रुपयाचेही अनुदान जमा झालेले नाही. शासनाकडून रेशनवर धान्य, व्यापाऱ्यांना ५० हजारांचे अनुदान, शेतकऱ्यांना मदतीची केवळ घोषणाच झाली. शासनाला जाग आणण्यासाठी आणि सुबुद्धी द्यावी, यासाठी बुधवारी गणपती मंदिरासमोर घंटानाद करून गणेशाला साकडे घातले जाणार असल्याचे साखळकर यांनी सांगितले.