‘वसंतदादा’स पुन्हा जप्तीची नोटीस
By Admin | Updated: August 28, 2014 23:04 IST2014-08-28T22:43:55+5:302014-08-28T23:04:36+5:30
तहसीलदारांची कारवाई : बिलाचे ४६ कोटी थकित

‘वसंतदादा’स पुन्हा जप्तीची नोटीस
मिरज : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यास शेतकऱ्यांच्या उसाच्या बिल वसुलीसाठी महसूल विभागाने मालमत्ता जप्तीची दुसरी नोटीस बजावली आहे. कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालकांना ही नोटीस बजाविण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. -वसंतदादा साखर कारखान्याने २०१३ व १४ च्या उसाचे बिल ४६ कोटी ३९ लाख रूपये शेतकऱ्यांना अद्याप दिलेले नाहीत. यासाठी शेतकरी संघटनेने आंदोलन केल्याने साखर आयुक्तांनी, ही रक्कम कारखान्याची मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून शेतकऱ्यांना द्यावी, असे आदेश दिले आहेत. १२ जुलैरोजी महसूल विभागाने कारखान्याच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याची कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे कारखाना व्यवस्थापनाने शासनाकडून कारखान्यासमोरील कर्मचारी वसाहतीसह शेजारील २१ एकर भूखंड विक्री करून शेतकऱ्यांची देणी भागविण्याच्या प्रस्तावास शासनाची मंजुरी घेऊन या जमीन विक्रीची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या ऊस बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी तहसीलदार किशोर घाटगे यांनी कारखान्याच्या सर्वच मालमत्तेवर शासनाचा बोजा चढविण्याची कारवाई सुरू केली आहे. महसूल विभागाने काढलेल्या नोटिसीमध्ये असे म्हटले आहे. सात दिवसात शेतकऱ्यांच्या उसाचे बिल ४६ कोटी ३९ लाख रूपये महसूल विभागाकडे जमा केले नाहीत, तर कारखान्याच्या मालमत्तेवर बोजा चढवून त्याची विक्री करून रक्कम वसूल करण्याचा इशारा नोटिसीद्वारे दिला आहे. दुसऱ्या नोटिसीला कारखाना व्यवस्थापनाने प्रतिसाद न दिल्यास तिसरी नोटीस देण्यात येऊन वसुली व जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. (वार्ताहर)