जयंतरावांकडील जलसंपदा खाते काढून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:29 IST2021-08-27T04:29:39+5:302021-08-27T04:29:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगलीबाबत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा जुना रोष पाहता सर्वांनाच त्यांच्याकडून योग्य उपाययोजना होण्याबाबत शंका ...

जयंतरावांकडील जलसंपदा खाते काढून घ्या
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगलीबाबत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा जुना रोष पाहता सर्वांनाच त्यांच्याकडून योग्य उपाययोजना होण्याबाबत शंका वाटते. त्यामुळे जलसंपदा खाते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे घ्यावे. जयंतरावांना सांस्कृतिक कार्यमंत्री करावे, अशी मागणी करीत सर्वोदय कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी पूरग्रस्तांसह निदर्शने केली.
येथील कृष्णा नदीकाठी टिळक चौकात आंदोलन करण्यात आले. महापूर संकट, कोरोना संकटकाळात जिल्हा प्रशासन, राज्य शासनाकडून लोकांचे जगणे अधिक खडतर होत असल्याचा आरोप करीत आंदोलकांनी निदर्शने केली. ‘कोरोनात अपयशी, महापुरात तोंडघशी’ अशा घोषणा देण्यात आल्या.
पृथ्वीराज पवार म्हणाले, २०१९ च्या निकषांनुसार पूरग्रस्तांना मदतीचे धोरण राबवायला हवे होते. मात्र या ठिकाणची स्थिती मंत्रिमंडळापर्यंत प्रभावीपणे पोहोचत नाही. मंत्री अपयश लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोरोनाची जिल्ह्यात दयनीय अवस्था आहे. महापुराने जगणे असह्य केले आहे. दोन्ही संकटांत पालकमंत्र्यांचे चुकलेले नियोजन कारणीभूत ठरले आहे. या संकटाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे. त्याउलट अभिनंदन, सत्कार होताहेत. लोकांच्या जखमेवर मीठ चोळले जातेय. महापूर रोखण्याच्या विषयात कागदी विमाने हवेत उडविली जात आहेत. नदीला भिंत बांधण्याआधी इस्लामपूर-सांगली रस्ता करावा. पंचगंगा नदी वळविण्याआधी शेरीनाल्याचा प्रश्न सोडवावा, असे ते म्हणाले.
यावेळी रेखा पाटील, उदय मुळे, अभिमन्यू भोसले, गोपाळ पवार, रवी वाडवणे, मीरा चौगुले, जयश्री भोसले, शाबिरा शेख, शुभम चव्हाण, राहुल बोळाज, आदी उपस्थित होते.