मुलीच्या मृत्यूनंतर नातेवाईकांचा शासकीय रुग्णालयात गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:25 IST2021-04-06T04:25:49+5:302021-04-06T04:25:49+5:30
फोटो : ०५०४२०२१एसएएन०१ : सांगलीच्या शासकीय रुग्णालयात प्रतीक्षा चव्हाण या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला. लोकमत न्यूज ...

मुलीच्या मृत्यूनंतर नातेवाईकांचा शासकीय रुग्णालयात गोंधळ
फोटो : ०५०४२०२१एसएएन०१ : सांगलीच्या शासकीय रुग्णालयात प्रतीक्षा चव्हाण या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : टॉन्सिलवरील उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या प्रतीक्षा सदाशिव चव्हाण (वय ११, रा. पळसवडे, ता. माण, जि. सातारा) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी डाॅक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळेच मृत्यू झाल्याचे म्हणत रुग्णालयात गोंधळ घातला. डाॅक्टरांवर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र, सायंकाळी उशिरा कोणतीही तक्रार नसल्याचे लिहून देत मृतदेह ताब्यात घेतला.
सातारा जिल्ह्यातील पळसवडे येथील प्रतीक्षा चव्हाण हिला टॉन्सिलवरील उपचारासाठी गुरुवार, दि. १ एप्रिल रोजी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. शनिवारी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यादरम्यान ती बेशुद्ध होती. रक्तस्राव सुरू असल्याने डॉक्टरांनी दुसरी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे नातेवाईकांना सांगितले होते. दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर तिला उपचारासाठी अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. दरम्यान, सोमवारी सकाळी तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी चुकीच्या उपचारामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप केला.
जोवर संबंधित डॉक्टरवर कारवाई होत नाही तोवर मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर काही सामाजिक संघटनांनीही रुग्णालयात येऊन कारवाईची मागणी केली. गोंधळ वाढतच गेल्याने तणाव निर्माण झाला होता. नातेवाईकांसह सामाजिक कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दिवसभर रुग्णालयात याबाबत चर्चा होती.
चाैकट
प्रकरणावर पडदा
रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे त्यांनी मृतदेहही ताब्यात घेतला नव्हता. अखेर सायंकाळी कोणतीही तक्रार नसल्याचे त्यांनी लिहून दिल्याने प्रकरणावर पडदा पडला.