लालपरीची सुरक्षा धोक्यात; सांगलीत एसटीतून अग्निशमन यंत्रेच गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:19 IST2021-02-20T05:19:44+5:302021-02-20T05:19:44+5:30
जिल्ह्यातील सर्वाधिक नागरिक राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करतात. सातारा बसस्थानकामध्ये पाच बस जळून खाक झाल्याची घटना नुकतीच घडली. ...

लालपरीची सुरक्षा धोक्यात; सांगलीत एसटीतून अग्निशमन यंत्रेच गायब
जिल्ह्यातील सर्वाधिक नागरिक राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करतात. सातारा बसस्थानकामध्ये पाच बस जळून खाक झाल्याची घटना नुकतीच घडली. या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने खबरदारी म्हणून अग्निशमन यंत्रे बसविण्याची गरज होती. पण, प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. आरटीओंच्या नियमानुसार प्रत्येक बसमध्ये अग्निशमन यंत्र आणि प्रथमोपचार पेट्या (बॉक्स) ठेवणे बंधनकारक आहे.
सांगली आगारात शुक्रवारी दुपारी तीन ते चार या वेळेत बारा बसची पाहणी केली. त्यापैकी पाच बसमध्ये अग्निशमन यंत्र नव्हते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही कोणतीच काळजी घेतली गेली नव्हती. स्वच्छतेकडेही गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचे चित्र होते. बसमध्ये अग्निशमन यंत्र, प्रथमोपचार पेट्यांची तपासणी करताना कोणीच हटकले नाही. बसस्थानकातून जाताना सुरक्षारक्षक आणि एका कर्मचाऱ्याने मात्र छायाचित्रे कशासाठी घेताय, अशी विचारणा केली. बसस्थानकात एसटी बसच्या सुरक्षिततेबाबत कोणीच गंभीर नव्हते, असे दिसून आले.
चौकट
या बसमध्ये अग्निशमन यंत्रच नाही !
१. सांगली-इचलकरंजी (एमएच १४/बीटी ३१०२)
१. सांगली-कुरुंदवाड (एमएच १४/बीटी २९२१)
१. सांगली-शिराळा (एमएच ०६/एस ८२०२)
१. सांगली शहरी बस (एमएच ४०/वाय ५०७२)
१. सांगली-मिरज शहरी बस (एमएच १४/बीटी १०८८)
चौकट
प्रथमोपचार पेट्या बेपत्ता
लालपरीमध्ये प्रवास करीत असताना अपघात झाला तर प्रवाशांसह चालक-वाहकांवर प्रथमोपचार करण्यासाठी चालकाच्या केबिनमध्ये प्रथमोपचार पेट्या बसविण्यात आल्या होत्या. त्या पेट्या गायब झाल्या आहेत. ‘एसटीचा प्रवास, सुरक्षित प्रवास’ या ब्रीदवाक्यातील ‘सुरक्षित’ हा शब्दच हद्दपार होत असल्याचे चित्र आहे.
चौकट
मनोरंजनाचे साधनही हिरावले
अँड्रॉइड मोबाइलच्या युगात बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मनोरंजन व्हावे याकरिता प्रत्येक बसमध्ये वाय-फाय यंत्रणा बसविण्यात आली होती. याचा ठेका खासगी कंपनीकडे होता. परंतु, वर्षभरातच यंत्रणेचा बोजवारा उडाला. बसमधील ही सुविधा बंद झाली असून काही बसमध्ये केवळ बॉक्स राहिले आहेत.
कोट
अग्निशमन यंत्र प्रत्येक बससाठी दिले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याचा शंभर टक्के वापर झाला पाहिजे. याकडे जे दुर्लक्ष करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. प्रथमोपचार साहित्य वाहकांच्या ताब्यात दिले आहे. गरज असेल त्या वेळी त्याचा वापर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. वाय-फाय सुविधेचा ठेका संपल्यामुळे ती सुविधा सध्या बंद आहे.
- अरुण वाघाटे, प्रभारी विभाग नियंत्रक, सांगली विभाग