छातीवरचा बिल्ला हाच माझ्यासाठी लाल दिवा..!
By Admin | Updated: November 4, 2015 23:06 IST2015-11-04T23:06:53+5:302015-11-04T23:06:53+5:30
सदाभाऊ खोत : एफआरपी एकरकमीच घेणार--सरकारला खरंच शेतीतले कळत नाही

छातीवरचा बिल्ला हाच माझ्यासाठी लाल दिवा..!
सागाव : मला शासनाच्या लाल दिव्याची गरज नाही. माझ्या छातीवरचा बिल्ला हाच माझा लाल दिवा आहे. यावर्षीच्या गळीत हंगामाचा एफआरपी एकरकमीच घेणार, याबाबत राज्यांचे मुख्यमंत्रीदेखील सहमत आहेत. जर याला कारखानदार अथवा सरकारने विरोध केला तर, रस्त्यावर उतरुन संघर्ष उभारू, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केले.सागाव (ता. शिराळा) येथील जाहीर सभेत ते बोलत होते. वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर अध्यक्षस्थानी होते.खोत म्हणाले, ६ नोव्हेंबरच्या जयसिंगपूर येथे होणाऱ्या ऊस परिषदेमध्ये सहकाराला साखर कारखाने खासगी करता येणार नाहीत. यासाठी कायद्यामध्ये कठोर निर्बंध घालावेत, अशा मागणीचे ठराव करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाला भाग पाडणार आहे. मला जर कोणत्याही पदाची अपेक्षा असती तर, आतापर्यंत मी दहा पक्ष बदलले असते.
यावेळी रविकांत तुपकर यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, तालुकाध्यक्ष राम पाटील, भास्करराव कदम उपस्थित होते. (वार्ताहर)
सरकारला खरंच शेतीतले कळत नाही
या राज्यातील सरकारला शेतातील काही समजत नाही, अशी टीका होते, हे खरंच आहे. मी या मताशी सहमत असून, पवार साहेबांना शेतीतील जास्त समजत असल्याने त्यांनी शेतीची पूर्ण वाट लावली आहे. या अगोदर आंदोलनावेळी पोलीस आमच्या अंगावर येत होते. परंतु आता याउलट स्थिती आहे. यावर्षीचा एफआरपी हा एकरकमीच घेणार आहे. जर कारखानदारांनी विरोध केला तर रस्त्यावर उतरुन संघर्ष करू, असे खोत यांनी स्पष्ट केले.