संवादासाठी त्यांनी केला टीव्हीला रामराम
By Admin | Updated: May 26, 2014 01:17 IST2014-05-26T00:40:23+5:302014-05-26T01:17:04+5:30
अनोखे पाऊल : पैसा असूनही सांगलीच्या तीन कुटुंबांनी नाकारला ‘इडियट बॉक्स’;

संवादासाठी त्यांनी केला टीव्हीला रामराम
नरेंद्र रानडे, सांगली : माणसाच्या जीवनावश्यक गरजा कोणत्या? असा प्रश्न विचारला तर अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच आता टीव्हीचे नावही बहुतांश लोक घेतील. या इडियट बॉक्सचे वेड वाढत असतानाच घरातील लोकांचा एकमेकांशी असलेला संवाद कमी होत आहे. या गोष्टीची जाणीव झालेल्या सांगलीच्या तीन कुटुंबांनी टीव्हीला चक्क रामराम ठोकला. पेशाने वकील, शिक्षक व विमा सल्लागार असलेल्या सांगलीतील तिघांनी टीव्हीशिवाय छान जगता येऊ शकते, हे दाखवून दिले आहे. टीव्ही आता प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे. दैनंदिन घडामोडींशी संलग्न राहतानाच मनोरंजनाचे मुख्य साधन म्हणून याकडे पाहिले जाते. श्रीमंतांचा राजवाडा असो की दारिद्र्याशी संघर्ष करणारी झोपडी, अशा प्रत्येक ठिकाणी टीव्हीने बस्तान बसविले आहे. अशा परिस्थितीत पैसा असूनही कोणी टीव्हीपासून दूर राहू शकतो, ही गोष्ट कोणालाही पटणार नाही. पण ही गोष्ट सांगलीतील तीन कुटुंबांनी शक्य करून दाखविली आहे. विश्रामबाग गव्हर्मेंट कॉलनीत राहणारे अॅड. आनंद देशपांडे, विश्रामबाग परिसरातच राहणारे शिक्षक व्ही. एस. शिंदे आणि शंभरफुटी रस्त्यावरील अरिहंत कॉलनीत राहणारे विमा सल्लागार विनायक बुटाले यांनी टीव्हीमुक्त जीवनाचा पायंडा पाडला आहे. दैनंदिन घडामोडींसाठी ते वृत्तपत्राचा आधार घेतात, तर करमणुकीसाठी चित्रपटगृहांसह नाट्यगृहाला ते पसंती देतात. टीव्ही नव्हता तेव्हा प्रत्येकजण आयुष्याचे जीवनगाणे उत्तमप्रकारे गातच होता. घरातीलच नव्हे तर परिसरातील नागरिकांनाही कित्येकजण नावानिशी ओळखत होते. घरी कोणी पाहुणे आले तर त्यांच्याशी भरभरुन बोलायला घरातील प्रत्येकजण उत्सुक असायचा. साहजिकच संवाद तुटक नव्हे, तर मनमोकळेपणाने व्हायचा. मुले सायंकाळी मैदानात खेळायला जायची यामुळे ती बेढब नव्हती, तर चपळ होती. लहानपणी कोणालाही चष्मा लागलेला दिसायचा नाही. परंतु सध्या बरोबर याच्या उलट परिस्थिती आहे. या सर्व गोष्टींची कल्पना आल्यानंतर त्याचे गांभीर्यही या तिन्ही कुटुंबांनी ओळखले आणि त्यांनी टीव्हीचा त्याग केला.