एटीएम यंत्रांची सुरक्षा रामभरोस
By Admin | Updated: November 5, 2014 00:09 IST2014-11-04T22:23:51+5:302014-11-05T00:09:27+5:30
शिराळ्यातील स्थिती : सहापैकी दोनच ठिकाणी सुरक्षारक्षके

एटीएम यंत्रांची सुरक्षा रामभरोस
विकास शहा - शिराळा शहरात सहा बॅँकांनी एटीएम यंत्राची व्यवस्था केली आहे. मात्र दोनच बँकांनी तेथे सुरक्षारक्षक नेमले असून, इतर बॅँकांनी मात्र त्या ठिकाणी सुरक्षेच्या कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. काही बॅँकांची एटीएम यंत्रणा बॅँकेच्या वेळेपुरतीच चालू असते. त्यामुळे ही सेवा असुरक्षित व बेभरवशाची बनली आहे.
शिराळ्यात स्टेट बॅँक आॅफ इंडिया, युनियन बॅँक आॅफ इंडिया, बॅँक आॅफ इंडिया, सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँक, आयसीआयसीआय, अॅक्सीस बॅँक येथे एटीएम यंत्राची व्यवस्था आहे. मध्यवर्ती बॅँक, युनियन वगळता इतर चारही एटीएम मशीन बसस्थानकापासून थोड्या अंतरावर आहेत.
या एटीएम यंत्र असलेल्या खोलीच्या दरवाजाच्या ठराविक ठिकाणी एटीएम कार्ड घातले तर दरवाजा उघडला पाहिजे. मात्र तसे न होता या सर्वच ठिकाणी दरवाजा सहजपणे उघडला जातो. आयसीआयसीआय व अॅक्सीस बॅँकेच्या एटीएम यंत्राठिकाणीच फक्त सुरक्षारक्षक आहेत. मात्र स्टेट बॅँक आॅफ इंडिया, युनियन बॅँक, बॅँक आॅफ इंडिया, मध्यवर्ती बॅँकेच्या एटीएम यंत्राच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थाच नाही.
मध्यवर्ती बॅँकेचे एटीएम यंत्र फक्त बॅँक कार्यालयीन वेळेतच सुरू असते. त्यानंतर याचा दरवाजा तसेच बॅँकेच्या शाखेचे मुख्य गेट बंद असते. यामुळे या बॅँकेची ही व्यवस्था कुचकामी ठरत आहे.
राष्ट्रीयीकृत बॅँकांमार्फत या एटीएम व्यवस्थेचा कंपनींना ठेका दिला गेला आहे. दरमहा ५० ते ६० हजार रुपये ही बॅँक या ठेकेदाराला देतात. यामध्ये ठेकेदाराकडून सुरक्षा व्यवस्था, या जागेचे भाडे, स्वच्छता आदींचा समावेश असतो. एटीएम व्यवस्थेबाबत सर्व बॅँकांमार्फत विमा उतरविला जातो. काही घडलेच तर विमा कंपनीकडून मोबदला मिळतो. या बॅँकेमार्फत मात्र सुरक्षा व्यवस्था नाही, की साधे दरवाजांना कुलूप नाही. एखाद्या वेळेस एटीएममधून पैसे काढणाऱ्या ग्राहकास लुटले जाण्याची भीती आहे. याकडे बॅँक तसेच ठेकेदारांनी लक्ष देऊन तातडीने सुरक्षाव्यवस्था पुरवावी, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.
जिल्हा बँकेचे एटीएम रात्री बंदच
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एटीएम केवळ बँकेच्या कार्यालयीन वेळेतच सुरू असते. बँकेचे कामकाज संपले की एटीएमही बंद होते. बँकेचे मुख्य प्रवेशद्वारही बंद केले जाते. त्यामुळे रात्रीच्यावेळी ग्राहकांना जिल्हा बँकेच्या एटीएमचा फारसा उपयोग होत नाही. इतर बँकांप्रमाणे जिल्हा बँकेचे ग्राहकही मोठ्या प्रमाणात आहेत. पण त्यांना या यंत्रणेचा लाभ होत नाही.
शिराळ्यातील बसस्थानक परिसरात विविध बँकांनी ग्राहकांच्या सोयीसाठी एटीएम यंत्रणा उभारली आहे. रात्रीच्यावेळी या एटीएमची सुरक्षा रामभरोसे असते. कोणत्याही एटीएमजवळ सुरक्षारक्षक नसतो. त्यामुळे ग्राहकांना लुटले जाण्याची भीती आहे.