दुरावलेल्या नेत्यांची मोट बांधण्यास राजू शेट्टी सरसावले
By Admin | Updated: June 24, 2014 01:20 IST2014-06-24T00:50:35+5:302014-06-24T01:20:38+5:30
इस्लामपूर मतदारसंघ : जयंतरावविरोधी नेते पुन्हा एकत्र येणार, विधानसभा निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी

दुरावलेल्या नेत्यांची मोट बांधण्यास राजू शेट्टी सरसावले
अशोक पाटील, इस्लामपूर : निवडणूक कोणतीही असो, वाळवा-शिराळ्यातील राजकीय समीकरणे सरड्याच्या रंगाप्रमाणे बदलत असतात! यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील हवा विधानसभा निवडणुकीतही कायम राहील याबाबत शाश्वती नाही. त्यामुळेच पुन्हा एकदा ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याविरोधातील नेत्यांची मोट बांधण्याच्या तयारीला खासदार राजू शेट्टी लागले आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकीनंतर शिवाजीराव नाईक आणि नानासाहेब महाडिक यांच्यातील दरी रुंदावली आहे. ती आताही कायम आहे. विधानसभा निवडणुकीत या दोघा नेत्यांना एकमेकांची गरज भासणार आहे. याची कल्पना असल्याने राजू शेट्टी या दोघांमधील दरी कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कामेरीचे सी. बी. पाटील आणि शिवाजीराव नाईक मागील विधानसभा निवडणुकीवेळी एकमेकांपासून दुरावले आहेत. त्याचा फटका जिल्हा परिषद निवडणुकीत सी. बी. पाटील यांचे पुत्र जयराज यांना बसला. त्यामुळे आता नाईक आणि पाटील यांच्यातही समझोता करण्याचा प्रयत्न होणार आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींबरोबर असलेले हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी या निवडणुकीत मात्र काँग्रेसच्या पाठीशी होते. काँग्रेसचे पानिपत झाल्यामुळे नायकवडी यांना पुढील काळात महायुतीशी समझोता करावा लागेल, असे बोलले जाते. सध्या हुतात्मा संकुलातील मतदार नायकवडी यांचा शब्द प्रमाण मानतीलच, असे वातावरण नाही. मागील विधानसभा निवडणुकीत इस्लामपूर मतदारसंघात महाडिक गट जयंत पाटील यांच्या बाजूने असल्याने नायकवडी यांचे नुकसान झाल्याचे सर्वश्रुत आहे. आता नायकवडी आणि महाडिक यांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नसल्याने खा. शेट्टी त्यांच्यात एकमत करण्याच्या प्रयत्नात आहेत.
वाळवा-शिराळ्यात काँग्रेसच्या आघाडीत बिघाडी होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. शिराळ्यात मानसिंगराव नाईक निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत, तर हा मतदारसंघ काँग्रेसला मिळाल्यास सत्यजित देशमुख व या दोघांच्या विरोधात शिवाजीराव नाईक यांनी दंड थोपटले आहेत. आघाडीतील बिघाडीचा फायदा आम्हालाच होणार, असे दोन्ही नाईकांचे कार्यकर्ते बोलत आहेत. या पार्श्वभूमीवर तेथेही शिवाजीराव नाईक यांच्याबाजूने फळी उभी करण्यासाठी खा. शेट्टी तयारीला लागले आहेत. तथापि जयंत पाटील यांचे विरोधक एकत्र येत नाहीत, हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला शह देण्यासाठी इस्लामपूर मतदारसंघात हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी, नानासाहेब महाडिक, सी. बी. पाटील, अभिजित पाटील, सदाभाऊ खोत, बाबासाहेब सूर्यवंशी, विक्रमभाऊ पाटील, आनंदराव पवार यांना एकत्र आणून त्यांची मोट बांधणे हेच आव्हान शेट्टी यांच्यासमोर असेल. यात ते यशस्वी झाले तर या इस्लामपुरात तुंबळ राजकीय लढाई पहायला मिळणार आहे.