राजेंद्रअण्णांसमोर विरोधक हतबल!

By Admin | Updated: June 11, 2015 00:25 IST2015-06-10T23:26:53+5:302015-06-11T00:25:58+5:30

माणगंगा, सूतगिरणीवर वर्चस्व : सेना-भाजपला दुहीचा फटका

Rajendra before the opposition opponent! | राजेंद्रअण्णांसमोर विरोधक हतबल!

राजेंद्रअण्णांसमोर विरोधक हतबल!

अविनाश बाड - आटपाडी -मागील महिन्याभरात आटपाडी तालुक्यातील माणगंगा सहकारी साखर कारखाना आणि बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणी या दोन मोठ्या संस्थांच्या निवडणुकीने राजकीय वातावरण तापले होते. अखेर या दोन्ही संस्थांवर माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळविली. आमदार अनिल बाबर यांच्या समर्थकांनी निवडणुकीत रंग आणला, पण माघार घेतली, तर भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारांना मात्र सभासदांनी नाकारले. राजेंद्रअण्णांच्या या डबल धमाक्याने देशमुख गटाच्या विरोधकांची गोची झाली आहे.
माणगंगा कारखाना स्थापनेपासून यंदा प्रथमच एवढी चुरशीची निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेनेच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भाजपनेही पॅनेल उभे केले. उमेदवारी अर्जासोबत ऊस उत्पादक शेतकरी असल्याच्या पूर्ततेबाबत थेट उच्च न्यायालयापर्यंत काहींनी धाव घेतली. त्यामुळे यंदाची निवडणूक अभूतपूर्व होण्याची चिन्हे निर्माण झाली. शिवसेना आणि भाजप यांची युती शेवटपर्यंत झाली नाही. मात्र गोपीचंद पडळकर यांनी ‘एकला चलो रे’ म्हणत प्रचारसभांचा धडाका लावला.
देशमुख गटाच्या विरोधात हे दोन गट एकत्र आले असते, तर कारखान्याच्या निवडणुकीनंतर एका गटाचे अस्तित्व संपुष्टात आले असते. राजेंद्रअण्णांनीही या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केल्याचे निवडणुकीत स्पष्ट झाले. त्यांना सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख, आमदार दीपक साळुंखे यांनीही साथ दिली. कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सभा झाल्या. दुष्काळाचे वारंवार संकट येऊनही, प्रसंगी टँकरने पाणी आणून कारखाना चालविणाऱ्या राजेंद्रअण्णांना सभासदांनी निवडणुकीत साथ दिली.
सूतगिरणीचीही यंदा प्रथमच निवडणूक झाली. भाजपच्या पडळकरांचे परिवर्तन पॅनेल आणि राजेंद्रअण्णांचे शेतकरी पॅनेल या दुरंगी सामन्यात देशमुख गटाने पुन्हा गुलाल उधळला. साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ वाचले असले तरी, सूतगिरणीच्या निवडणुकीत दोन उमेदवार वगळता इतरांचे ‘डिपॉझिट’ही जप्त झाले.
या संस्थांच्या निवडणुकीत देशमुखांच्या पुढच्या पिढीतील हर्षवर्धन आणि दिग्विजय या तरुणांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच निवडणुकीला सामोरे जाण्याऐवजी या दुष्काळी भागातील संस्थांवर निवडणुकीच्या खर्चाचा बोजा नको, म्हणून सामोपचाराने बिनविरोध निवडणुका करण्याचा कल असलेल्या राजेंद्रअण्णांनी निर्विवाद विजय मिळविला. असे असले तरी, या प्रस्थापितांशी कसलीही तडजोड न करता ठामपणे निवडणुकांना सामोरे जाणारे भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेमुळे तालुक्याच्या राजकीय संघर्षात वाढ झाली, एवढे मात्र नक्की.
तालुक्यात आलेल्या ‘टेंभू’च्या पाण्यामुळे तालुक्याबरोबर साखर कारखान्याच्या उसाचा दुष्काळही कायमचा संपण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यात साखर कारखाना आणि सूतगिरणीला सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे.

Web Title: Rajendra before the opposition opponent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.