अमरापूरच्या पुलावर पावसाने गुडघाभर पाणी
By Admin | Updated: June 15, 2015 00:20 IST2015-06-15T00:01:04+5:302015-06-15T00:20:38+5:30
काम निकृष्ट : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

अमरापूरच्या पुलावर पावसाने गुडघाभर पाणी
नेवरी : विजापूर-कऱ्हाड राज्यमार्गावरील अमरापूर (ता. कडेगाव) गावालगत येरळा नदीवरील पुलावर पहिल्याच पावसात गुडघाभर पाणी साचल्याने वाहनधारकांची त्रेधा उडाली. नवीन पुलावरच पाणी साचल्याने वाहनधारक कसरत करत होते. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रस्त्यांचे काम निकृष्ट झाल्याची चर्चा असून, याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
गेल्या तीन वर्षापूर्वी अमरापूरला येरळा नदीवर पुलाचे काम सुरू होते. त्यावेळेस निकृष्ट कामाबदल संबंधित खात्याकडे तक्रार करूनही अधिकाऱ्यांनी गांधारीची भूमिका घेतली होती. ठेकेदाराने घाईघाईत हे काम पूर्ण केले होते. अद्याप पावसाला सुरुवात झाली नसली तरी, पहिल्याच पावसात या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने वाहनधारकांनी डोक्याला हात लावला. पुलावरील खड्डेही तसेच आहेत. साचलेल्या पाण्यातून खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनधारकांची तारांबळ उडताना दिसत आहे. सध्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. परिणामी वाहनधारकांचे हाल होत आहेत. या कामाची सखोल चौकशी करून रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करावा, अशी मागणी प्रवाशांतून केली जात आहे. (वार्ताहर)