निसर्गानं मारलं, पाटबंधारेनं फसवलं!
By Admin | Updated: July 10, 2014 00:40 IST2014-07-10T00:38:32+5:302014-07-10T00:40:52+5:30
शाळगाव परिसराची अवस्था : खरीप हंगाम धोक्यात

निसर्गानं मारलं, पाटबंधारेनं फसवलं!
शाळगाव : निसर्गानं मारलं... पाटबंधाऱ्यानं फसवलं आणि महावितरणने पळवलं... अशा विचित्र अवस्थेत सध्या शाळगाव (ता. कडेगाव) परिसरातील शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.
शाळगाव परिसर कडेगाव तालुक्यातील उत्तरेकडील शेवटचे टोक. या परिसरात शाळगाव, रायगाव, बोंबाळेवाडी, विहापूर, शिवाजीनगर, येडे, उपाळे, हिंगणगाव बुद्रुक अशी गावे येतात. खरीप व रब्बी पिकांसाठी पूर्वी प्रसिध्द, परंतु शाळगाव, करांडेवाडी, शिवाजीनगर आणि हिंगणगाव बुद्रुक येथे तलाव झाल्याने नंतर बागायत पिकांनी जोर धरला. पूर्वी या भागात पानमळे होते. आता कारखाने झाल्याने ऊसपीक घेतले जात आहे.
आज मात्र या भागाची अवस्था विचित्र झाली आहे. हिंगणगाव व शिवाजीनगर तलावात टेंभूचे पाणी सोडले आहे. त्यामुळे या दोन गावातील परिस्थिती बऱ्यापैकी आहे. परंतु शाळगाव, करांडेवाडी या दोन तलावात पाणी नाही.
त्यामुळे या भागातील परिस्थिती अवघड बनली आहे. गेले अनेक दिवस पावसाची अवकृपा आहे. साहजिकच खरीप हंगाम धोक्यात आला आहे. तलाव आहे, परंतु पाटबंधारे खात्याच्या मनमानी कारभारामुळे या तलावात टेंभूचे पाणी कायमस्वरूपी येऊ शकत नाही. अशा परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांनी बागायत पिके घेतली आहेत.
ऊसपीक मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु महावितरणची वीज कधी येते कधी जाते याचा पत्ताच नसतो. बटण दाबून दाऱ्यावर जाईपर्यंत वीज गुल होते. त्यामुळे शेतकऱ्यांना विजेसाठी पळापळ करावी लागते. त्यामुळे शेकडो एकर ऊसपीक धोक्यात आले आहे. साहजिकच निसर्गानं मारलं, पाटबंधाऱ्यानं फसवलं आणि महावितरणनं पळवलं, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. (वार्ताहर)