कवठेमहांकाळमध्ये तलाव आटले
By Admin | Updated: November 23, 2015 00:31 IST2015-11-22T23:07:56+5:302015-11-23T00:31:07+5:30
पाण्याचा प्रश्न गंभीर : पंधरा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक

कवठेमहांकाळमध्ये तलाव आटले
अर्जुन कर्पे -- कवठेमहांकाळ तालुक्यातील ११ तलावांपैकी ७ तलावांतील पाणीसाठा येत्या आठवडाभरात आटण्याच्या मार्गावर असून, उर्वरित ४ तलावांतील पाणीसाठा १५ दिवस पुरेल एवढाच शिल्लक राहिलेला आहे. तसेच ९0 टक्के रब्बीची पेरणी झालेले क्षेत्र पाण्याअभावी व पावसाअभावी वाया जाणार आहे. तालुक्यात शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, येत्या १५ दिवसांनंतर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर येणार आहे. या सर्व प्रश्नांकडे प्रशासन असो की, राजकीय प्रतिनिधी असोत, डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे.
खरीप हंगामानंतर किमान नोव्हेंबरपर्यंत तरी पाऊस येईल, असा शेतकऱ्यांचा अंदाज होता आणि रब्बी हंगाम सुरळीत पार पडेल असे वाटत होते. तालुक्यातील शेतकऱ्यांनी तेवीस हजार नऊशे सहासष्ट हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी एकवीस हजार पाचशे सत्त्याहत्तर हेक्टरवर रब्बी ज्वारी, गहू, मका, हरभरा, सूर्यफूल, करडई आदी गळीत धान्याची एकूण ९0 टक्के क्षेत्रावर पेरणी केली. या रब्बी हंगामात पाऊस येईल अथवा ‘म्हैसाळ’चे पाणी मिळेल, या आशेवर शेतकरी होता. परंतु शेतकऱ्यांची घोर निराशा झाली. ना पाऊस आला, ना ‘म्हैसाळ’चे पाणी. त्यामुळे रब्बी हंगाम पूर्णपणे वाया जाण्याच्या अवस्थेत आला.
तालुक्यात ११ तलावांतील जो उपलब्ध पाणीसाठा आहे, तोही १५ डिसेंबरपर्यंतच पुरणार आहे. यापैकी ७ तलावांतील पाणीसाठा पूर्णपणे गाळापर्यंत पोहोचला आहे; तर उर्वरित ४ तलावांतील पाणीसाठा फक्त १५ डिसेंबरपर्यंतच पुरेल इतका आहे. त्यामुळे हे उपलब्ध पाणी फक्त पिण्यासाठी उपयोगी पडणार आहे. याचा शेतीला काहीही उपयोग होणार नाही. तसेच म्हैसाळ योजनेचे १८ कोटी रुपये वीज बिल थकित असल्याने म्हैसाळ योजना ही सध्या बंद आहे. त्यामुळे वीज बिल भरल्याखेरीज म्हैसाळचे पाणी शेतीला मिळणार नाही. त्यामुळे रब्बी हंगामही तरणार नाही.
एकूणच पाण्याअभावी शेतीचे व शेतकऱ्यांचे मोठे हाल सुरू झाले आहेत.
तलावक्षमता उपलब्ध पाणी
कुची७९.0५८.६
रायवाडी७६.६० ३२.१४
लांडगेवाडी ३७.0३१.0५
लंगरपेठ ७८.३९११.८८
नांगोळे४५.८५१७.८९
बोरगाव५७.७११.७५
दुधेभावी १४०.६३१५.0५
घोरपडी ५३.२७ 0.0४
बंडगरवाडी ७२.६१३९.६८
बसाप्पाचीवाडी २७४.५७ १८१.१४
पाणी नाही : उत्पादन खर्च निघणेही कठीण
यावर्षी कवठेमहांकाळ तालुक्यात पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे खरीप हंगामही कसाबसा शेतकऱ्यांनी घेतला. खरीप हंगामात ‘म्हैसाळ’चे पाणी थोड्या प्रमाणात आले. परंतु ते बेभरवशाचे ठरले. नियमितपणे खरीप हंगामात ‘म्हैसाळ’चे पाणी मिळू शकले नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे हतबल झाला. साधा उत्पादन खर्चही खरीप हंगामात त्याला मिळू शकला नाही.