पार्टी करण्यासाठी गेलेला पोलीस कृष्णा नदीत बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:26 IST2021-04-11T04:26:48+5:302021-04-11T04:26:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कृष्णा नदीवरील डिग्रज बंधाऱ्यावर मित्रांसमवेत पार्टी करण्यासाठी गेलेला नवविवाहित पोलीस वाहून गेल्याची घटना शुक्रवारी ...

पार्टी करण्यासाठी गेलेला पोलीस कृष्णा नदीत बुडाला
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कृष्णा नदीवरील डिग्रज बंधाऱ्यावर मित्रांसमवेत पार्टी करण्यासाठी गेलेला नवविवाहित पोलीस वाहून गेल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. सुनीलकुमार गणपती पाटील (वय ३१, रा. अष्टविनायकनगर, माधवनगर) असे त्याचे नाव असून, शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास त्याचा मृतदेह नदीपात्रात मिळून आला. पाटील मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. दोन महिन्यांपूर्वी लग्नासाठी ते सुटीवर आले होते.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुंबई पोलीस दलात वरळी येथे कार्यरत असलेले पाटील दोन महिन्यांपूर्वी लग्नासाठी सुटीवर आले होते. विवाह झाल्यापासून ते सुटीवरच होते. शनिवारी सायंकाळी पुन्हा ते सेवेत हजर होण्यासाठी मुंबईला जाणार होते. त्याअगोदर शुक्रवारी दुपारी त्यांचे मित्र तानाजी सादरे व महेश पवार यांच्यासमवेत डिग्रज बंधारा येथे पार्टी करण्यासाठी गेले होते. तेथे जेवणानंतर सायंकाळी पाटील बंधाऱ्याच्या पूर्वेकडील बाजूंनी पोहण्यासाठी पाण्यात उतरले. नदीपात्रात असलेल्या खडकाळ भागापर्यंत जाऊन परत येत असतानाच त्यांना दम लागल्याने पाण्यात वाहत गेले. मात्र, पोहता येत असल्याने ते पाण्यात आतबाहेर करत असतील, असे काठावरील मित्रांना वाटले. पण काही क्षणातच पाटील पाण्यात वाहून गेले.
मित्रांनी व नदीकाठावर असलेल्या इतरांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला; मात्र यश आले नाही. सांगली ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आयुष हेल्पलाईन टीम, विश्वसेवा फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी शोधकार्य सुरू केले. रात्र झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली होती. शनिवारी सकाळी पुन्हा एकदा शाेध सुरू करण्यात आला. दुपारी दोनच्या सुमारास त्यांचा मृतदेह मिळाला. शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. पोलीस कर्मचारी संजय परशकर, सुनील जाधव यांनी शोधकार्यात भाग घेतला.
चौकट
दीड महिन्यापूर्वीच झाले होते लग्न
सुनीलकुमार पाटील दोन महिन्यांची सुटी घेऊन माधवनगरला आले होते. दीड महिन्यांपूर्वी लग्न झाल्यापासून ते येथेच होते. सुटीनंतर शनिवारी पुन्हा मुंबईला सेवेत हजर हाेण्यासाठी जाणार होते. मात्र तत्पूर्वीच दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.