खेळाडू तेच, कर्णधार नवा
By Admin | Updated: August 11, 2015 23:38 IST2015-08-11T23:38:34+5:302015-08-11T23:38:34+5:30
नवे मुख्याधिकारी : इस्लामपूरची बारामती होणार का?

खेळाडू तेच, कर्णधार नवा
अशोक पाटील - इस्लामपूर माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी इस्लामपूरची बारामती करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारीपद सांभाळलेल्या दीपक झिंजाड यांना येथील मुख्याधिकारीपदी बसविले आहे. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केलेले पालिकेतील खेळाडू तेच आहेत, केवळ कर्णधार नवीन येत आहे. ते तरी इस्लामपूरची बारामती करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पालिकेने विविध विकास कामांवर कोट्यवधीचा खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाची कामे केल्याचा दावा केला आहे, परंतु ती निकृष्ट झाल्याने काही प्रकल्पांचे नूतनीकरण करण्याचा डाव आखला आहे. गेल्या साडेचार वर्षात तत्कालीन मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी हायटेक सिटी करण्याचे स्वप्न सत्ताधाऱ्यांना दाखविले होते. त्यामध्ये पालिकेतील काही नेते अडकले. मात्र देशमुख यांनी इस्लामपूर शहर केवळ कागदोपत्री हायटेक करून ठेवले. सवंग लोकप्रियतेसाठी सोशल मीडियावर घोषणांचा डंका वाजवला गेला. त्यामुळे आता जयंत पाटील यांनी झिंजाड यांना मुख्याधिकारीपदी काम करण्यासाठी पाचरण केले आहे.
मुख्याधिकारी देशमुख यांची बदली करून त्यांच्या जागी झिंजाड यांना इस्लामपुरात आणले असल्याचा दावा विरोधी पक्षातील काही नेत्यांनी केला आहे. सध्या इस्लामपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पोहण्याच्या तलावाचे तीनतेरा वाजले आहेत. हा तलाव दुरुस्तीच्या नावाखाली सध्या बंद आहे. अंबिका देवालयानजीकची पूर्वीची बाग उद्ध्वस्त करून त्याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची बाग उभारण्याचे काम सुरू आहे. कोट तलाव येथील बोटिंग क्लबचे काम अर्ध्यावरच सोडण्यात आले आहे. घनकचरा नियोजन, प्रभागातील गटारींची अवस्था दयनीय आहे. तुंबलेली गटारे काढण्यास स्वच्छता विभाग असमर्थ ठरला आहे. रस्त्यांची कामे निकृष्ट झाल्याने पाऊस पडण्याअगोदरच रस्त्यावर खड्डे पडले आहेत. १९८० पासून नवीन विकास आराखड्याला मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे या नव्या कर्णधाराला जयंतरावांच्या जुन्याच खेळाडूंसमवेत काम करताना आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारीपद भूषविलेले दीपक झिंजाड मंगळवारी इस्लामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारपदी रूजू झाले आहेत.
मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांचे स्वागतच होईल. त्यांनी पारदर्शक कारभार करणे गरजेचे आहे. सध्या पालिका वर्तुळात एजंट, बोगस ठेकेदारांचा सुळसुळाट आहे. त्यामुळे प्रशासनातील सर्व कारभार अनागोंदीसह भ्रष्टाचारी बनला आहे. शहरात होणारा विकास खुंटला असून, जो विकास झाला आहे, त्याचा दर्जा ढासळलेला आहे.
- विजय कुंभार, विरोधी पक्षनेते