जिल्ह्यात मुलींचा टक्का वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:29 IST2021-09-21T04:29:16+5:302021-09-21T04:29:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मुली सर्वच क्षेत्रात चमकू लागल्यामुळे मुलींबाबतची पालकांचे विचारही बदलत आहेत. अवैधरीत्या गर्भपात करणाऱ्या ...

जिल्ह्यात मुलींचा टक्का वाढला
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मुली सर्वच क्षेत्रात चमकू लागल्यामुळे मुलींबाबतची पालकांचे विचारही बदलत आहेत. अवैधरीत्या गर्भपात करणाऱ्या रुग्णालयांवरही कारवाई झाल्यामुळे त्यावरही काही प्रमाणात निर्बंध बसले आहेत. यातूनच जिल्ह्यात मुलींच्या जन्माचा टक्का वाढत आहे. जिल्ह्यात दर हजार मुलांमागे २०१८ मध्ये ८९८ असणारे मुलींचे प्रमाण आज ९२२ पेक्षाही जास्त झाले आहे.
सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात मुली आता मुलांबरोबर काम करताना पाहायला मिळतात. आठ- दहा वर्षांपूर्वीची मानसिकता आता बऱ्याच प्रमाणात बदलली आहे. एक- दोन मुलींनंतर मुलगा व्हावा म्हणून मिरज, वाळवा या तालुक्यांतील रुग्णालयातून अवैधरीत्या गर्भपात करण्याचे प्रकार उघड झाले; परंतु कोरोना काळात मार्च २०२० पासून प्रवास आणि विनाकारण फिरण्यावर निर्बंध होते. त्यामुळे अवैध गर्भपात झालेच नाहीत. त्यामुळे मुलींच्या जन्माचा टक्का वाढल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. दुसरीकडे, पालकांचे विचारही आता प्रगल्भ झाल्याचे दिसत आहेत. मुलींना नोकरी, राजकारणात स्वतंत्र आरक्षण असल्याने तिच्या प्रगतीचे द्वार खुले झाले आहे. अनेक मुलींनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशाचे शिखर गाठले आहे.
चौकट
हजार मुलांमागे मुली किती?
२०१७ : ९०३
२०१८ : ८९८
२०१९ : ९०६
२०२० : ९२२
चौकट
लोकांमधील जनजागृतीचा फायदा
सुशिक्षितांची संख्या वाढल्यामुळे सध्या मुलगा, मुलगी असा भेदभाव फारसा होत नाही. तसेच लिंगनिदानास बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी केली जात आहे. तीन ते चार डॉक्टरांवर कडक कारवाई केल्यामुळे अन्य डॉक्टर लिंगनिदान करून देत नाहीत. जनतेमध्ये जनजागृती केल्याचाही फायदा होत आहे. यातूनच सध्या जिल्ह्यात ८९८ मुलींचा जन्मदर आज ९२२ पर्यंत वाढला आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील यांनी दिली.