गावांच्या विकासासाठी लोकसहभाग गरजेचा

By Admin | Updated: November 23, 2015 00:31 IST2015-11-22T23:03:21+5:302015-11-23T00:31:22+5:30

शिवाजीराव नाईक : कोंडाईवाडीतील उपक्रम विकासाला चालना देणारा

People need no help for the development of the village | गावांच्या विकासासाठी लोकसहभाग गरजेचा

गावांच्या विकासासाठी लोकसहभाग गरजेचा

कोकरूड : लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व ग्रामस्थांना एकत्रित करुन जनता दरबार घेऊन कोंडाईवाडीतील युवकांनी विकासाला चालना देणारा कार्यक्रम घेऊन आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन भाजपचे आ. शिवाजीराव नाईक यांनी केले.
कोंडाईवाडी (ता. शिराळा) येथे ग्रामपंचायत व माऊली जिजाऊ प्रतिष्ठानच्यावतीने घेतलेल्या जनता दरबारमध्ये ते बोलत होते. यावेळी माजी आ. मानसिंगराव नाईक, काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख उपस्थित होते.
आ. नाईक म्हणाले, गावाच्या विकासासाठी लोकसहभाग व प्रशासन यांची सांगड घालून काम केल्याने गावाचा चेहरामोहरा बदललेला दिसून येईल. कोंडाईवाडीतील मुंबईकर बांधवांची गावासाठी असणारी तळमळ ही निश्चितच प्रेरणादायी आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे तालुक्यातील तलाव अपूर्ण भरल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली. शिराळा व वाळवा तालुका ‘जलयुक्त शिवार’मध्ये येत नव्हते. परंतु सरकारशी विचारविनियम करुन शिराळा तालुक्यातील ४५ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. थोड्याच दिवसात त्याची अंमलबजावणी शासनाकडून होईल. पुढील वर्षापासून जलयुक्त शिवारमधून कामे मार्गी लागणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.
माजी आ. मानसिंगराव नाईक यांनी, कोंडाईवाडीतील विकासासाठी घेतलेला कार्यक्रम कौतुकास्पद आहे. याचा इतर गावे निश्चित आदर्श घेतील. गावातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी शाश्वत पाणी मिळण्यासाठी कृषी विभागाने जलयुक्त शिवार किंवा पाणलोट विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
सत्यजित देशमुख म्हणाले, उत्तर भागातील ग्रामस्थांनी जलयुक्त शिवार अभियानामधून कामे करून घेण्यासाठी पुढे आले, तर प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहिलेली दिसेल. गावातील सर्वच विकासकामे शासन करेल असे नाही, परंतु जी कामे लोकसहभागातून होतील ती एकत्रित येऊन पूर्ण करावीत.
यावेळी कृषी अधिकारी माने यांनी एकात्मिक पाणलोट कार्यक्रमामधून १० गावांना पंचायत समितीच्या माध्यमातून भात काढणी यंत्र वितरण केल्याचे सांगितले. यावेळी प्रकाश पाटील, के. डी. पाटील, सभापती चंद्रकांत पाटील, सरपंच मालनताई लाड, पं. स. सदस्या शारदा घारगे, उपसरपंच सुभाष कारंडे, बापू लाड, उत्तम पाटील, विष्णू सावंत, प्रकाश पवार, इब्राहीम मुलाणी, सुनील सावंत उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: People need no help for the development of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.