बावचीत आरक्षणामुळे इच्छुकांमध्ये शांतता
By Admin | Updated: December 29, 2016 22:30 IST2016-12-29T22:30:16+5:302016-12-29T22:30:16+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक : गोटखिंडी पंचायत समिती गणातच हालचालींना वेग

बावचीत आरक्षणामुळे इच्छुकांमध्ये शांतता
प्रतापसिंह माने ल्ल गोटखिंडी
जिल्हा परिषद मतदारसंघ पुनर्रचनेत वाळवा तालुक्यात नव्याने बावची गटाची निर्मिती झाली आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला हा नवीन मतदारसंघ आहे. हा गट प्रथमच आरक्षणात अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव, तर पंचायत समितीचा बावची गणही अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्यामुळे, जास्त इच्छुकांची नावे पुढे येत नसल्याचे चित्र आहे.
बावची गट व बावची गण येथे आरक्षणामुळे मातब्बरांच्या आशेवर पाणी पडले आहे. बावची व गोटखिंडीतून मतदारांची संख्या अधिक असल्याने राष्ट्रवादीकडून कोणाची वर्णी लागेल, याकडे लक्ष लागून राहिले आहे. फक्त गोटखिंडी पंचायत समिती गण खुला आहे. वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीविरोधात इतर सर्व पक्ष, संघटना एकत्रित येऊन लढणार, यावरच समीकरणे अवलंबून आहेत.
बावची गटातून १९९८ व २००२ मध्ये राष्ट्रवादीचे नेते वसंतराव रकटे यांनी प्रतिनिधित्व केले होते. रकटे यांना तीन वर्षे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापतीपद मिळाले होते. कुशल कामकाजामुळे त्यांचा दबदबा राहिला होता. यावेळी या मतदार संघात बावची, गोटखिंडी, पोखर्णी, नागाव, काकाचीवाडी, रोजावाडी, फाळकेवाडी, मर्दवाडी मिरजवाडी व कारंदवाडी या गावांचा समावेश होता. पंचायत समितीसाठी संभाजी कचरे व वैभव शिंदे निवडून आले होते.
मतदार संघाची २००७ मध्ये पहिल्यांदा पुनर्रचना झाली. बावची मतदारसंघ रद्द होऊन बावची गाव वाळवा मतदार संघाला जोडले गेले. तेव्हा राष्ट्रवादी व हुतात्मा गटात समझोता झाला आणि प्राचार्या सुषमा नायकवडी यांची बिनविरोध निवड झाली होती. बावची पंचायत समिती गणात बंडखोरी झाली. मात्र हुतात्मा गटाच्या प्रभावती गुरव निवडून आल्या. त्यावेळेस गोटखिंडी गाव कामेरी जि. प. मतदार संघाला जोडले गेले. २००७ ला काँग्रेसमधून राधादेवी निळकंठ या विजयी झाल्या. गोटखिंडी पंचायत समिती गणातून काँग्रेसकडून सुरेश पाटील विजयी झाले.
नंतर २०१२ च्या वाळवा जि. प. मतदार संघातून हुतात्मा गटाला धक्का देत राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील विजयी झाले. बावची पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीचे लालासाहेब अनुसे विजयी झाले. गोटखिंडी गणातून राष्ट्रवादीच्या रेखाताई कोळेकर विजयी झाल्या.
आता पुन्हा बावची मतदार संघाची पुनर्रचना झाली. त्यामध्ये बावची व गोटखिंडी गणाचा समावेश झाला. बावची गणात बावची, नागाव, पोखर्णी, भडकंबे, तर गोटखिंडी गणात गोटखिंडी, येडेनिपाणी व मालेवाडी गावांचा समावेश आहे. बावची, गोटखिंडी, येडेनिपाणी ही तीन मोठी गावे असून येथील ग्रामपंचायतींवर वर्चस्व राष्ट्रवादीचे आहे. बावची गटात अनुसूचित महिला आरक्षण असल्याने बावचीच्या विद्यमान सरपंच वंदनाताई शिंदे व दलितमित्र विजय लोंढे यांच्या स्नुषा रिना लोंढे राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. त्यांच्याविरोधात तालुक्यात इतर पक्षांची कशी आघाडी होते, कोणाची उमेदवारी असणार, हे चित्र स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे अजून शांतता दिसून येत आहे.
बावची गणात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. येथून राष्ट्रवादीकडून संभाजी मस्के, पोखर्णीचे अशोक वायदंडे इच्छुक असल्याचे समजते. राष्ट्रवादीच्याविरोधात बावची ग्रामपंचायत सदस्य आशिष काळे इच्छुक आहेत. गोटखिंडी गणात हुतात्मा, काँग्रेसचे गट तुल्यबळ आहेत. गोटखिंडी गण खुला असल्यामुळे उमेदवारीसाठी इच्छुकांची रेलचेल आहे. राष्ट्रवादीतून विद्यमान उपसरपंच विजय पाटील, माजी उपसरपंच धैर्यशील थोरात, येडेनिपाणीचे विद्यमान पंचायत समिती सदस्य नंदकुमार पाटील, डॉ. सचिन पाटील, माजी उपसरपंच रायसिंग पाटील इच्छुक आहेत. या गणात हुतात्मा गट प्रबळ असल्याने गोटखिंडी ग्रामपंचायतीचे सदस्य दिलीप पाटील दावेदार आहेत. काँग्रेसकडून येडेनिपाणीच्या शिवतीर्थ दूध संघाचे कार्यकारी संचालक आनंदराव पाटील, एन.एस.यु.आय.चे प्रदेश सरचिटणीस उदय थोरात, माजी उपसरपंच विजय पाटील इच्छुक आहेत.