तीन हप्त्यामध्ये वीज बिले भरून घ्यावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST2021-06-22T04:19:36+5:302021-06-22T04:19:36+5:30
कुपवाड : कोरोना महामारीमुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांचे फार मोठे नुकसान झालेले असून अनेक उद्योग बंद पडले ...

तीन हप्त्यामध्ये वीज बिले भरून घ्यावीत
कुपवाड : कोरोना महामारीमुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे
जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांचे फार मोठे नुकसान झालेले असून अनेक उद्योग बंद पडले आहेत. उद्योजकांनी पाठविलेल्या मालांचे सर्व पेमेंट पूर्णपणे ठप्प झालेले असून उद्योजकांना वीज बिलाची रक्कम एकरकमी भरणे अशक्य झाले आहे. या परिस्थितीतून सावरण्यासाठी उद्योजकांना तीन हप्त्यांमध्ये वीज बिले भरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडे केली आहे.
‘महावितरण’ला दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांचे लॉकडाऊनमुळे फार मोठे नुकसान झालेले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव विचारात घेता कोरोना अजून संपलेला नाही. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग बंद पडले आहेत. लॉकडाऊनच्या काळात कामगार स्थलांतरीत झाल्यामुळे त्याचा उत्पादनावर व उद्योगांवर मोठा परिणाम झालेला आहे. पहिल्या लॉकडाऊनमधून सावरत असतानाच दुसरा लॉकडाऊन लागला. दुसऱ्या लॉकडाऊनमुळे उद्योग पूर्णपणे मोडकळीस आलेले आहेत.
अशातच उद्योजकांनी पाठविलेल्या मालांचे सर्व पेमेंट पूर्णपणे ठप्प झालेले आहेत त्यामुळे उद्योजकांना वीज बिलाची रक्कम एकरकमी भरणे अशक्य झाले आहे.
उद्योजक मेटाकुटीला आलेले आहेत. त्यामुळे ‘महावितरण’ने उद्योजकांना वीज बिले ३ हप्त्यांमध्ये भरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी कृष्णा व्हॅली चेंबरच्यावतीने ‘महावितरण’च्या अधीक्षक अभियंत्यांकडे करण्यात आली आहे.
यावेळी कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू, व्हा. चेअरमन जयपाल चिंचवाडे, सचिव गुंडु एरंडोले, संचालक रमेश आरवाडे, दीपक मर्दा, हरिभाऊ गुरव, बाळासाहेब पाटील, अरुण भगत, नितीश शहा उपस्थित होते.