खासगी विद्यापीठांच्या उभारणीत पतंगराव कदम यांचे मोठे योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:28 IST2021-04-27T04:28:35+5:302021-04-27T04:28:35+5:30
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचा २६वा स्थापना दिन काेरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन साजरा झाला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुजुमदार ...

खासगी विद्यापीठांच्या उभारणीत पतंगराव कदम यांचे मोठे योगदान
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचा २६वा स्थापना दिन काेरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन साजरा झाला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुजुमदार यांनी संवाद साधला. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, विद्यापीठाचे कार्यवाह, विश्व विद्यालयाचे प्र कुलगुरू व राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ.माणिकराव साळुंखे, भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालक डॉ.अस्मिता जगताप, सहकार्यवाह व. भा. म्हेत्रे, डॉ.के.डी. जाधव, डॉ.एम.एस. सगरे, कुलसचिव जी. जयकुमार यावेळी उपस्थित होते.
डॉ.मुजुमदार म्हणाले. काेरोनामुळे विद्यार्थी नसलेला विद्यापीठाचा परिसर पाहणे क्लेशदायक वाटते. बागा आहेत, पण फुले नाहीत, अशी अवस्था आहे. विध्वंसक काेरोनाने माणसांना स्वतःविषयी अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडले आहे. अशाश्वततेची जाणीव करून देताना साधेपणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. काेरोनाची लाट संपल्यानंतर सर्व काही पूर्ववत होईल, अशी आशा आहे.
डॉ.शिवाजीराव कदम म्हणाले, काेरोनाच्या या संकटात संशोधनाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. प्रयोगशाळेतील संशोधनाचा समाजासाठी उपयोग होणे गरजेचे असून, संशोधनात माणसांचे प्राण वाचविण्याचे सामर्थ्य असले पाहिजे, अशा संशोधनात भारती विद्यापीठ अग्रेसर आहे.
डॉ.विश्वजीत कदम म्हणाले, भारती विद्यापीठ स्थापनेपासूनच डॉ.पतंगराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कायम ध्येयवादाने कार्यरत राहिलेले आहे. शिक्षण क्षेत्रात प्रगतीची झेप घेताना भारती विद्यापीठाने नेहमीच सामाजिक बांधिलकीला सर्वोच्च प्राधान्य दिले.
डॉ.साळुंखे यांनी भारती विश्वविद्यालयाच्या प्रगतीचा अहवाल सादर करताना, नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी भारती विद्यापीठ सज्ज आहे, असे सांगितले. विचार भारतीचे संपादक प्रा.मिलिंद जोशी यांनी स्वागत केले. जी.जयकुमार यांनी आभार मानले.