शिक्षणाचे खासगीकरण रोखण्याच्या चळवळीत सहभागी व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:19 IST2021-02-20T05:19:49+5:302021-02-20T05:19:49+5:30
शिक्षण संस्था महामंडळाच्या अधिवशेनाच्या तयारीसाठी आयोजित बैठकीत रावसाहेब पाटील बोलत होते. यावेळी शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष शिवाजी माळकर, उपाध्यक्ष ...

शिक्षणाचे खासगीकरण रोखण्याच्या चळवळीत सहभागी व्हा
शिक्षण संस्था महामंडळाच्या अधिवशेनाच्या तयारीसाठी आयोजित बैठकीत रावसाहेब पाटील बोलत होते. यावेळी शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष शिवाजी माळकर, उपाध्यक्ष अशोक थोरात, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सदानंद भागवत, संस्थाचालक संघाचे जिल्हा सचिव नितीन खाडीलकर, माजी महापौर सुरेश पाटील, प्रा. एम. एस. रजपूत, आर. एस. चोपडे, प्रशांत चव्हाण, प्रा. एस. ए. आरबोळे आदी उपस्थित होते.
रावसाहेब पाटील पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील बहुजन समाजातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी शिक्षण संस्था सुरू झाल्या. अनेक संस्था चालकांनी पदरमाेड करून शाळा चालविल्या आहेत. या शाळा बंद पाडून भांडवलदारांच्या शाळा चालविण्याचे सध्या सरकारची धोरण दिसत आहेत. अनुदानित शाळा भविष्यात बंद पडल्यास बहुजन समाज शिक्षण प्रवाहातून बाजूला पडण्याचा मोठा धोक्का आहे. म्हणूनच सर्वांनीच भांडवलदारांच्या तावडीतून शिक्षण वाचविण्याच्या चळवळीत सहभागी झाले पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकार शिक्षणावरील खर्च वाढविण्याऐवजी दिवसेंदिवस कमी करित आहे हेही चिंताजनक आहे. याबाबतही शिक्षण संस्थाचालकांनी आवाज उठविला पाहिजे.
प्रा. एन. डी. बिरनाळे, सदानंद भागवत, अशोक थोरात, सुरेश पाटील यांनीही शिक्षणाच्या खासगीकरणाविरोधात सरकारवर जोरदार टीका केली.
चौकट
शिक्षण संस्थांच्या प्रमुख मागण्या
-वेतनेतर अनुदान चार टक्के आणि इमारत भाडे नाममात्र एक टक्का मिळते. यामध्ये शासनाने वाढ करावी.
-शिक्षक, शिक्षकेतर भरतीबंदीमुळे संस्थांना शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याचे मोठे आव्हान आहे. यामुळे भरतीवरील बंदी उठवावी.
-शिक्षणाचे खासगीकरण थांबवावे.
-शिक्षकेत्तर कर्मचारी नियुक्तीचे जाचक अटी बंद करुन पूर्वीप्रमाणेच भरतीप्रक्रीया सुरु ठेवावी.
चौकट
अधिवेशनास अर्धा डझन मंत्री
अधिवशेनाचे उदघाटन पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड, उच्चशिक्षणमंत्री डॉ. उदय सामंत, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, राज्यमंत्री बच्चू कडू आदी आर्ध्याडझनाहून जास्त मंत्री अधिवशेनास उपस्थित राहाणार आहेत.