मालगावात गाळ्यांच्या फेरलिलावास व्यापाऱ्यांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:32 IST2021-09-16T04:32:52+5:302021-09-16T04:32:52+5:30
ओळ : मालगाव (ता. मिरज) येथील गाळे फेरलिलावप्रश्नी सरपंच अनिता क्षीरसागर यांनी गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांना निवेदन दिले. ...

मालगावात गाळ्यांच्या फेरलिलावास व्यापाऱ्यांचा विरोध
ओळ : मालगाव (ता. मिरज) येथील गाळे फेरलिलावप्रश्नी सरपंच अनिता क्षीरसागर यांनी गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांना निवेदन दिले. यावेळी शशिकांत कनवाडे, अजित भंडे, गंगाधर यलपरटे उपस्थित होते.
मालगाव : मालगाव (ता. मिरज) येथे गेली ४० वर्षे व्यवसायाच्या माध्यमातून उदरनिर्वाह सुरू आहे. ग्रामपंचायतीचे भाडे कधीही थकविलेले नसताना ग्रामपंचायतींच्या गाळ्यांच्या फेरलिलावाचा घाट घातला जात आहे. या फेरलिलावास व्यापाऱ्यांनी गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांची भेट घेऊन विरोध दर्शविला. याप्रश्नी ताेडगा काढण्याचे आश्वासन सरगर यांनी यावेळी दिली.
मालगाव ग्रामपंचायतीच्या इमारतीत दुकान गाळे अहेत. या गाळ्यात कापड व्यापारी, किराणा दुकानदार, टेलेरिंग व्यवसाय, दूध डेअरी आदी व्यवसाय गेली ४० ते ५० वर्षे सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी ग्रामसभेत दुकान गाळे रिकामे करून फेरलिलाव घेण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने कोणतीही सुविधा दिली नसताना गाळेधारक नियमित भाडे भरून व्यवसाय करीत आहेत. असे असताना ग्रामपंचायतीने फेरलिलाव करण्याचा निर्णय घेतल्यास या व्यावसायिकांना माेठा फटका बसणार आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे व्यवसाय पूर्णपणे डबघाईला आलेले असताना फेरलिलावाने व्यापारी उद्ध्वस्त होणार आहेत. वारंवार सुडबुद्धीने फेरलिलावाची मागणी होत असल्याचा आराेप करीत पंचायत समितीचे उपसभापती अनिल आमटवणे, सदस्य काकासाहेब धामणे यांच्या उपस्थितीत व्यापारी महेश कोकणे, अविनाश कबाडगे, सुनील सुगाणावर, सुकुमार किनिंगे यांनी गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांची भेट घेऊन गाळे फेरलिलावास विरोध करीत याप्रश्नी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली.
गाळेधारकांच्या वतीने सरपंच अनिता क्षीरसागर यांनी गटविकास अधिकारी सरगर यांना निवेदन दिले. यावेळी शशिकांत कनवाडे, अजित भंडे, गंगाधर यलपरटे, शबाना मुजावर, रुपाली माळी, पुष्पा शिंदे यांच्यासह रवींद्र क्षीरसागर, जाकीर मुजावर, राजू माळी उपस्थित होते.
चौकट
मालगाव ग्रामपंचायतींच्या गाळ्यांसंदर्भात अन्याय होणार नाही, यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांनी व्यापाऱ्यांना दिले.