जत तालुक्याचा पाणी प्रश्न जयंत पाटीलच सोडवू शकतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:29 IST2021-08-27T04:29:19+5:302021-08-27T04:29:19+5:30

जत : स्व. राजारामबापू पाटील यांचे स्वप्न होते की दुष्काळी जत तालुक्याला पाणी मिळाले पाहिजे. राजारामबापूंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ...

Only Jayant Patil can solve the water problem of Jat taluka | जत तालुक्याचा पाणी प्रश्न जयंत पाटीलच सोडवू शकतात

जत तालुक्याचा पाणी प्रश्न जयंत पाटीलच सोडवू शकतात

जत : स्व. राजारामबापू पाटील यांचे स्वप्न होते की दुष्काळी जत तालुक्याला पाणी मिळाले पाहिजे. राजारामबापूंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हैशाळ योजनेपासून वंचित ६५ गावांच्या विस्तारित योजनेसाठी सहा टीएमसी पाणी मंजूर केले. त्यांचा हा निर्णय शेतकऱ्यांना समृद्ध करणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील, जत पंचायत समितीचे माजी सभापती मन्सूर खतीब, माजी नगरसेवक भय्या कुलकर्णी, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुडडोडगी, प्रकाश व्हनमाने, योगेश व्हनमाने, दयगोंडा बिराजदार, माजी सरपंच नशीर मुल्ला आदी उपस्थित होते.

जमदाडे म्हणाले, विस्तारित योजनेच्या मंजुरीसाठी आम्ही सर्वांनी प्रांत कार्यालयासमोर पदाधिकारी व शेतकऱ्यांसोबत उपोषण केले होते. सततचा पाठपुरावा व जनमताचा आदर करून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पाणी उपलब्धतेसाठी खूप प्रयत्न केले होते. लोकनेते कै. राजारामबापू यांनी उमदीपर्यंत केलेली पदयात्रा व त्यांचे तालुक्यावर असणारे विशेष प्रेम यामुळे त्यानी जिद्दीने सहा टीएमसी पाणी उपलब्ध केले आहे.

बसवराज पाटील म्हणाले, स्वर्गीय बापूंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जयंत पाटील यांनी जत तालुक्यात लक्ष घालण्यासाठी आम्ही सर्वांनी साकडे घातले. सहा टीएमसी पाणी मंजूर करून विस्तारित म्हैसाळ योजनेला मंजुरी दिली आहे. भविष्यात अशाच प्रकारचे प्रश्न सोडविण्याची धमक जयंत पाटील यांच्यातच आहे. आगामी काळातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बँक, मार्केट कमिटी, नगर परिषद या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठीशी ताकद उभी करावी लागणार आहे.

चौकट

जत तालुक्यातील राजकीय समीकरण बदलणार?

जत तालुक्यातील विस्तारित पाणी योजनेचा ज्वलंत पाणी प्रश्न होता. या संदर्भात जयंत पाटील यांच्याकडे जतच्या सर्वच नेत्यांनी पाठपुरावा केला होता. पाटील यांनी विस्तारित पाणी योजनेला सहा टीएमसी पाणी मंजूर केल्याने दुष्काळी भागातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात भाजप, जनस्वराज, काँग्रेस पक्षातील मातब्बर नेते पक्षप्रवेश करणार असल्याने राजकीय समीकरण बदलणार आहेत.

Web Title: Only Jayant Patil can solve the water problem of Jat taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.