इस्लामपुरात महायुती ठरवेल तोच उमेदवार
By Admin | Updated: May 29, 2014 00:53 IST2014-05-29T00:52:58+5:302014-05-29T00:53:08+5:30
सदाभाऊ खोत : पुन्हा ‘एक वोट एक नोट’चा नारा

इस्लामपुरात महायुती ठरवेल तोच उमेदवार
अशोक पाटील ल्ल इस्लामपूर ‘बापाने ऊस पिकवायचा, पोराने लाखो रुपये भरून जयंतरावांच्या शिक्षण संस्थेत शिकायचे आणि कमी पगारावर त्यांच्याच संस्थेत चाकरी करायची. या गुलामगिरीला इस्लामपूर मतदारसंघातील लोक कंटाळले आहेत. जयंतरावांच्या विरोधात आगामी विधानसभेला महायुती जो उमेदवार ठरवेल, त्याच्या पाठीशी स्वाभिमानी शेतकरी संघटना राहणार आहे. मलाच उमेदवारी दिल्यास या धनशक्तीविरोधात पुन्हा ‘एक वोट एक नोट’चा नारा देऊन लढू’, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. सध्या ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघात तळ ठोकला आहे. सामाजिक, नैमित्तिक कार्यक्रमास त्यांची उपस्थिती जाणवत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांच्याविरोधात कोण, अशी चर्चा सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांत सुरू आहे. दुसरीकडे मोदी लाटेवर स्वार होण्यासाठी विरोधी पक्षात इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत आहे. यावर सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले की, महायुतीतील ज्येष्ठ नेते जो उमेदवार निश्चित करतील, तोच उमेदवार जयंतरावांविरोधात राहणार आहे. जनतेतून आपली मागणी झाल्यास आपणही त्यांच्याविरोधात लढू. इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांचे पारंपरिक नेतृत्व असले, तरी मतदारांना ज्या सवयी लागल्या आहेत, त्या मोडून ‘एक नोट एक वोट’ हा फॉर्म्युला घेऊन विधानसभेच्या आखाड्यात उतरणार आहे. या तालुक्यातील कार्यकर्ते जयंत पाटील यांच्या दबावाखाली आहेत. त्यांनी निर्माण केलेल्या संस्थांमध्ये नोकरीच्या निमित्ताने जे कामगार आहेत, त्यांना ते गुलामच असल्याचे मानतात. या तालुक्यातील ऊस उत्पादक काबाडकष्ट करून उसाचे उत्पादन घेतो. आमच्याच प्रयत्नातून त्यांना उसाला चांगला दर मिळतो. याच ऊस उत्पादकांच्या ताकदीवर साखरसम्राटांनी शिक्षण संस्था उभ्या केल्या आहेत. याच माध्यमातून ते या परिसरातील विद्यार्थ्यांना लाखो रुपये घेऊन शिकवतात. त्यामुळे येथील मतदार आपला गुलामच असल्याचे जयंत पाटील मानत आहेत. लोकसभा निवडणुकीत जनतेने ही गुलामगिरी झुगारून टाकली आहे. आता विधानसभेलाही हीच परिस्थिती राहणार असल्याने विरोधी फळीत इच्छुकांची संख्या वाढत असली, तरी महायुतीचा जो निर्णय होईल तोच उमेदवार अंतिम राहील, असे खोत यांनी स्पष्ट केले.