मजुरीच्या वाटेवरील शंभर विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात

By Admin | Updated: June 12, 2015 00:33 IST2015-06-12T00:13:56+5:302015-06-12T00:33:28+5:30

बालकामगार प्रकल्पाचा उपक्रम : शिक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जनजागृतीच्या प्रयत्नांना यश

One hundred students on the way to the laboratory | मजुरीच्या वाटेवरील शंभर विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात

मजुरीच्या वाटेवरील शंभर विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात

नरेंद्र रानडे - सांगली -घरातील दारिद्र्यामुळे भविष्यात ज्या विद्यार्थ्यांची गणना बालकामगार म्हणून झाली असती, असे मजुरीच्या मार्गाने जाऊ पाहणारे जिल्ह्यातील शंभर विद्यार्थी यंदा शैक्षणिक प्रवाहात सामील होणार आहेत. बालकामगार प्रकल्पांतर्गत येणाऱ्या विशेष प्रशिक्षण केंद्रातील शिक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे या अशक्य गोष्टीला मूर्त रूप आले आहे.
गरिबीमुळे महागाईचा सामना करण्यासाठी काही अशिक्षित पालक पाल्यांना शाळेत घालण्याऐवजी कामाला पाठविणेच पसंत करतात. येथेच बालमजुरीचा जन्म होतो. अशा विद्यार्थ्यांना शोधून त्यांच्या पालकांचे प्रबोधन करुन त्यांच्या हाताला धरुन शाळेत आणण्याचे कार्य विशेष प्रशिक्षण केंद्र म्हणजेच बालकामगार शाळेच्या माध्यमातून करण्यात येतो. बाकीच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शैक्षणिक खर्चाचा बोजा पडत असला तरी, ‘विशेष प्रशिक्षण केंद्र’ याला अपवाद आहे. येथील विद्यार्थ्यांना सर्व सुविधा देण्यात येतात. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी ज्या विद्यार्थ्यांची ७५ टक्केपेक्षा अधिक उपस्थिती आहे, अशा विद्यार्थ्यांना शासनाकडून दरमहा १५० रुपये भत्ताही देण्यात येतो. जिल्ह्यात नऊ शाळा कार्यरत असून तेथे २७ शिक्षक, नऊ लिपिक आणि नऊ शिपाई कार्यरत आहेत. या सर्वांच्या प्रयत्नाने तसेच बालकामगार प्रकल्प विभागातील अधिकाऱ्यांच्या साहाय्याने मार्च २०१५ अखेर वाड्या-वस्त्यांवर फिरुन जनजागृती करण्यात आली. परिणामी यंदाच्यावर्षी सर्व विद्यार्थी शाळेची पायरी चढणार आहेत. विद्यार्थ्यांना अधिकाधिक ज्ञान मिळावे, यासाठी शाळेत प्रतिवर्षी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींबरोबर संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यंदाच्या वर्षीही अधिकाधिक तज्ज्ञ व्यक्ती शाळेत येण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.


नऊ बालकामगार शाळांमध्ये १९५ विद्यार्थी शिक्षण घेत असून यंदाच्या वर्षीपासून नवीन शंभर विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश होणार आहे. हे सर्व विद्यार्थी कृती दलाने सुटका केलेले नसून, जे विद्यार्थी भविष्यात बालकामगार म्हणून काम करण्याची शक्यता आहे, अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना समजावून सांगितल्यानेच हे शक्य झाले आहे.
- शिवाजी शेळके, क्षेत्रीय अधिकारी,
राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प सांगली


बालमजुरी थांबविणे हे केवळ बालकामगार प्रकल्पाचे कार्य नाही. यामध्ये समाजाचा सहभाग आवश्यक आहे. मजुरीच्या वाटेवरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे कार्य मोलाचे आहे. बालकामगार आढळतात का, यासाठी मागीलवर्षी ५० ठिकाणी तपासणी मोहीम राबविली. त्यामध्ये आम्हाला बालकामगार आढळून आले नाहीत.
- नितीन पाटणकर,
सहायक कामगार आयुक्त, सांगली.


बालमजूर कोणास म्हणायचे?
चौदा वर्षाखालील शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासावर परिणाम होईल असे कोणत्याही प्रकारचे काम करणारे व शाळाबाह्य अथवा शाळेत जाणारे विद्यार्थी अथवा विद्यार्थिनी.

बालकामगारांसाठी धोकादायक व्यवसाय
गालीचे विणणे, सिमेंट उत्पादन, विडी व फटाके उत्पादन, आगपेट्या तयार करणे, वेठबिगार, खाणीत काम करणे, दुकाने व आस्थापनांमध्ये कामे बालकामागरांसाठी धोकादायक आहेत.

Web Title: One hundred students on the way to the laboratory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.