आता लाॅकडाऊनमध्ये काय विकायचे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:24 IST2021-04-12T04:24:03+5:302021-04-12T04:24:03+5:30
सांगली : राज्य शासनाने लॉकडाऊन खुशाल करावे, पण तत्पूर्वी जनतेला काय मदत करणार, हेही जाहीर करावे. गेल्या लाॅकडाऊनमध्ये कर्जाचे ...

आता लाॅकडाऊनमध्ये काय विकायचे?
सांगली : राज्य शासनाने लॉकडाऊन खुशाल करावे, पण तत्पूर्वी जनतेला काय मदत करणार, हेही जाहीर करावे. गेल्या लाॅकडाऊनमध्ये कर्जाचे हप्ते, घर चालविण्यासाठी अनेकांनी जमिनीही विकल्या. आता काय विकायचे? असा सवाल मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी रविवारी केला.
सावंत म्हणाले की, राज्य शासनाने लाॅकडाऊनचे संकेत दिले आहे. त्यांनी खुशाल लाॅकडाऊन करावे, पण सर्वसामान्यांसाठी सरकार काय करणार, हेही जाहीर करावे. गतवर्षी कोरोनामुळे जनता भयभीत झाली होती. त्यामुळे स्वयंस्फूर्तीने कडक लाॅकडाऊन पाळला. त्यात लोकांच्या नोकऱ्या गेल्या. उद्योगधंदे बंद पडले. शेतीमालाचे नुकसान झाले. कर्जाचे हप्तेही थकले. सर्वसामान्य नागरिक लाॅकडाऊनमुळे होरपळून निघाला होता. त्यानंतर शासनाने वीजबिल माफ करण्याची घोषणा केली. त्याचे काय झाले. उलट जबरदस्तीने बिलाची वसुली सुरू आहे. बँकांनी कोणतीही मुदतवाढ न देता जबरदस्ती कर्ज हप्ते वसूल केले. गेल्यावेळीच्या लॉकडाऊनमुळे हप्ते भरू न शकलेल्या लोकांची वाहने फायनान्स कंपन्यांनी ओढून नेली. काही लोकांनी कमी किमतीत वाहने विकली. काहींनी तर कर्जाचे हप्ते, कर, विमाहप्ते टॅक्स भरण्यासाठी जमीन विकली मग आता काय विकायचे? याचे सरकारने उत्तर द्यावे.
लॉकडाऊनमुळे हतबल व कर्जबाजारी झालेले लोक अजून सावरलेले नाहीत. पुन्हा दुसरा लॉकडाऊन केल्यास नोकऱ्या जातील. सलूनसारखे छोटे व्यावसायिक देशोधडीला लागतील. अशा व्यावसायिकांना आर्थिक मदतीची हमी राज्य शासनाने घ्यावी. मगच लाॅकडाऊन जाहीर करावा, अशी मागणीही सावंत यांनी केली आहे.