शेतकऱ्यांसाठी अच्छे नव्हे, बुरे दिन : जयंत पाटील
By Admin | Updated: May 27, 2015 00:59 IST2015-05-26T23:13:13+5:302015-05-27T00:59:05+5:30
पोलिसांचे दुर्लक्ष : अधीक्षकांच्या बंदी आदेशाला आव्हान, अनधिकृत व्यवसाय जोमात...

शेतकऱ्यांसाठी अच्छे नव्हे, बुरे दिन : जयंत पाटील
इस्लामपूर : पंतप्रधान मोदी यांच्या काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन नव्हे, तर बुरे दिन आले आहेत. शेतकऱ्यांना चांगला ऊसदर मिळावा, अशी शासनाची इच्छा दिसत नाही, असा आरोप माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी केला. शासनाने महागाई नियंत्रणात ठेवताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
साखराळे (ता. वाळवा) येथील मुख्य चौकात सत्ताधारी राजारामबापू सहकार पॅनेलच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष पी़ आऱ पाटील, बँकेचे अध्यक्ष प्रा़ शामराव पाटील, राष्ट्रवादीचे विष्णूपंत शिंदे, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, उमेदवार विजयबापू पाटील, कार्तिक पाटील, बिनविरोध विजयी झालेले दादासाहेब मोरे उपस्थित होते़
आ़ पाटील म्हणाले, भाजपचे अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अनेक मंत्री अधिवेशनास कोल्हापुरात येऊन गेले़ मात्र एकानेही ऊसदर, साखर निर्यातीचा प्रश्न उपस्थित करण्याचे धाडस दाखवले नाही. जर शरद पवार कोल्हापुरात येणार असते किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापुरात शिबिर असते तर, एका-एकाने किती दंगा केला असता? केंद्र शासनाने नोंव्हेबरपर्यंत निर्यातीचा निर्णय घेऊन साखर निर्यात केली असती तरी साखरेला २८-३० रुपयापर्यंत दर मिळून आपणास चांगला दर मिळाला असता़
विजयबापू पाटील म्हणाले, विरोधी चारपैकी तीन उमेदवार साखराळेचे असल्याने या पॅनलेच्या पाठीशी जास्तीत-जास्त मताधिक्य देण्याची आपली जबाबदारी आहे़
पी़ आऱ पाटील म्हणाले की, पिण्याच्या पाण्याच्या योजना करणे हे कारखान्याचे काम नाही़ तरीही पिण्याच्या पाण्याच्या योजना करणाऱ्या गावांना १० टक्के लोकवर्गणीपैकी पाच टक्के लोकवर्गणीची रक्कम दिली आहे़ प्रा़ शामराव पाटील यांनी खासगी संस्थांच्या आव्हानाने अनेक सहकारी संस्था बंद पडत असताना, राजारामबापू समूहातील सर्व संस्था खासगी संस्थांना समर्थपणे तोंड देत यशस्वी वाटचाल करीत आहेत.
संचालक बाबूराव पाटील यांनी प्रास्ताविक केले़ माजी सभापती शैलेंद्र सूर्यवंशी, सुनील पाटील, माजी अध्यक्ष विनोद बाबर, शशिकांत बाबर, संतोष पाटील यांनी सहकार पॅनेलला मताधिक्य देण्याची ग्वाही दिली़ चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले़ माजी अध्यक्ष बाबासाहेब डांगे यांनी सूत्रसंचालन केले़ सभापती आनंदराव पाटील, सरपंच सौ़ रंजना माने, सौ़ मल्लिकाबेगम मुल्ला, भास्कर पाटील, सुबराव डांगे, शिवाजी डांगे, शिवाजी माने, पी़ बी़ सुर्वे, अविनाश पाटील, विश्वास माने, जयकर डांगे, रंगराव बाबर, अर्जुन विरकर, दिलीप जंगम उपस्थित होते. (वार्ताहर)
रघुनाथदादांना टोला
काहीजण म्हणतात, कर्जे फार झाली, मात्र ही कर्जे वाढीसाठी घेतली आहेत़ साखर विकली की कर्जे कमी होणार आहेत, असे सांगत आ़ पाटील शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांचा नामोल्लेख टाळून अध्यक्ष पी़ आऱ पाटील यांना म्हणाले, ‘दादा, ज्यांना काही शंका आहेत, त्यांना जरा आपल्याकडे बोलावून माहिती देत जा. विजयबापू लगेच नाराज होतील, असे नाही़, मात्र एखाद्याने फक्त रडायचेच ठरवले तर त्यांचे अश्रू बघण्याशिवाय आपण काही करू शकत नाही़