रस्ता रुंदीकरणात येणारी झाडे तोडण्यास मनाई
By Admin | Updated: June 27, 2014 00:42 IST2014-06-27T00:42:02+5:302014-06-27T00:42:13+5:30
महापालिकेला दणका : न्यायालयाचा निर्णय

रस्ता रुंदीकरणात येणारी झाडे तोडण्यास मनाई
सांगली : सांगली-मिरज मार्गावरील पुष्पराज चौक ते विश्रामबाग या रुंदीकरणातील १२४ झाडे तोडण्यास आज, गुरुवारी जिल्हा न्यायालयाने ७ जुलैपर्यंत मनाई केली. यासंदर्भात विकास मगदूम यांच्यावतीने अॅड. अमित शिंदे व अॅड. दीपक हेगडे यांनी जनहित याचिका दाखल केली होती. म्हणणे मांडण्यास मुदत देण्याची महापालिकेची मागणीही न्यायालयाने फेटाळली.
शहरातील पुष्पराज चौक ते विश्रामबाग या हिरव्या गर्द झाडांनी नटलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणावरून बरेच वादंग निर्माण झाले आहे. या रस्त्यावरील सुमारे सव्वाशे झाडे रुंदीकरणात नष्ट होणार आहेत. जिल्हा सुधार समितीने वृक्षतोडीविरोधात आंदोलन हाती घेत विरोध केला होता. त्यासाठी चिपको आंदोलनही केले. शिवाय वृक्षतोडीविना रुंदीकरणाचा प्रस्तावही सादर केला होता. त्यानंतर महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत काही अटींवर वृक्षतोडीस मंजुरी देण्यात आली. या झाडांच्या बदल्यात सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराने रस्त्याच्या दुतर्फा ६०० झाडे लावण्याची अट घातली आहे.
वृक्षतोडीविरोधात विकास मगदूम यांच्यावतीने काल, बुधवारी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस. आर. नावंधर यांच्या न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेत रस्ता रुंदीकरणाला आमचा विरोध नाही. महापालिकेने वृक्षतोडीस परवानगी देताना बेकायदेशीर प्रक्रिया राबविली आहे. वृक्षतोडीशिवाय रुंदीकरणाचा प्रस्ताव आयुक्तांना दिला होता; पण त्याची दखल न घेता कायदा धाब्यावर बसवून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी केली.
या याचिकेवर आज सुनावणी झाली. महापालिकेचे वकील अरविंद देशमुख यांनी, म्हणणे मांडण्यासाठी मुदत द्यावी, अशी विनंती केली. मगदूम यांच्यावतीने अॅड. अमित शिंदे यांनी म्हणणे मांडले. पालिकेने ११ जूनला वृक्षतोडीस मान्यता दिली आहे. त्यानंतर १५ दिवसांत प्रत्यक्ष वृक्षतोड करता येते. त्यामुळे आज अथवा उद्या झाडे तोडली जाऊ शकतात. एकदा झाडे तोडल्यानंतर याचिकेला अर्थच उरणार नाही, असा युक्तिवाद केला. त्यावर न्यायाधीश नावंधर यांनी ७ जुलैपर्यंत वृक्षतोडीला मनाई केली. (प्रतिनिधी)