कऱ्हाडात नऊशे जणांच्या कमरेला पिस्तूल!

By Admin | Updated: August 18, 2015 00:50 IST2015-08-18T00:50:46+5:302015-08-18T00:50:46+5:30

उपविभागातील धक्कादायक वास्तव : स्वसंरक्षणासाठी घेतलाय अनेकांनी परवाना; राजकीय नेते, बिल्डरांचा समावेश; दोनशे शेतकरीही बंदूकधारी

Nine people pistol in Karhad! | कऱ्हाडात नऊशे जणांच्या कमरेला पिस्तूल!

कऱ्हाडात नऊशे जणांच्या कमरेला पिस्तूल!

संजय पाटील, कऱ्हाड : कऱ्हाड हा संवेदनशील उपविभाग. येथे अनेक गुन्हेगारी कारवाया घडतात. या गुन्हेगारी वृत्तींचा सामना अनेकवेळा सामान्यांनाही करावा लागतो. हे करीत असताना स्वत:जवळ शस्त्र बाळगण्याची वेळही अनेकांवर येते. सध्या कायदेशीर सोपस्कार पार पाडून तब्बल ८७० जणांनी आपल्या कमरेला पिस्तूल अडकवलंय. एकट्या कऱ्हाड उपविभागात ही धक्कादायक परिस्थिती आहे.
पैसा, मालमत्ता, पूर्ववैमनस्य किंंवा संघर्षाच्या माध्यमातून अनेकवेळा काहीजणांवर जीवघेणा प्रसंग येतो. संबंधित व्यक्तीभोवती गुन्हेगारी कारवायांचा फास आवळला जातो. गुन्हेगारी वृत्ती पैसा, मालमत्ता किंवा संघर्षाच्या कारणावरून संबंधित व्यक्तीच्या जिवावरही उठतात. त्यामुळे या गुन्हेगारी कारवायांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी काहीवर शस्त्र बाळगण्याची वेळ येते. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व परिस्थितीची पडताळणी केल्यानंतर प्रशासनाकडून अशा अर्जदारांना शस्त्र बाळगण्याचा रितसर परवाना दिला जातो; मात्र असा परवाना देतानाही प्रशासनाकडून संबंधित व्यक्तीची सखोल चौकशी होते. त्याने ज्या कारणास्तव शस्त्राच्या परवान्याची मागणी केली आहे, त्या कारणाचीही खातरजमा केली जाते. तसेच त्या व्यक्तीची कौटुंबिक पार्श्वभूमी, उत्पन्न, एकूण मालमत्ता, दैनंदिन उलाढाल, आयकर दाता याचीही चौकशी होते. सध्या परवान्याची ही कार्यवाही आणखी कडक करण्यात आली आहे.
कऱ्हाड उपविभागाचा विचार करता येथे कायदेशिररीत्या स्वत:सोबत शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्या तब्बल ८७० आहे. त्यामध्ये राजकीय नेत्यांसह, बिल्डर, उद्योजकांचा जास्त समावेश आहे. संबंधितांनी सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडून शस्त्र स्वत:सोबत ठेवण्याचा परवाना घेतला आहे. शस्त्र बाळगणाऱ्यांची ही संख्या आश्चर्यकारक नसली तरी धक्कादायक निश्चितच आहे. मुळातच गत काही महिन्यांपासून कऱ्हाड शहरासह परिसरातील गुन्हेगारी कारवाया प्रचंड वाढल्या आहेत. खून, मारामारी यासारख्या घटनांनी कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. अशातच ८७० जणांमध्ये विविध कारणास्तव असुरक्षिततेची भावना असेल तर ते धक्कादायकच म्हणावे लागेल.
दोनशे शेतकऱ्यांकडे बंदूक
वन्य श्वापद किंवा रानटी प्राण्यांपासून पिकाचे नुकसान होत असेल तर शेती संरक्षणासाठी म्हणून प्रशासनाकडून शेतकऱ्यांना शस्त्र बाळगण्याचा परवाना दिला जातो. या परवान्यावर शेतकरी सिंंगल किंवा डबल बारची बंदूक वापरू शकतात. कऱ्हाड उपविभागात बंदूक बाळगणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या २०९ आहे.
वनविभागाचा अहवाल महत्त्वाचा

शेती संरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याचा परवाना देताना वनविभागाने दिलेला अहवाल महत्त्वाचा ठरतो. परवान्यासाठी शेतकऱ्याला प्रांत कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा लागतो. त्यानंतर प्रांताधिकारी हा अर्ज पडताळणीसाठी संबंधित विभागातील तलाठ्याकडे पाठवितात. त्या शेतकऱ्याच्या शेतीचे वन्य पशुकडून नुकसान होत असल्याबाबत तलाठी व वनविभागाने अहवाल दिल्यास इतर आवश्यक पडताळणीनंतर संबंधित शेतकऱ्याला शस्त्र बाळगण्याचा परवाना दिला जातो.
जिल्हाधिकारी
कार्यालयाकडून कार्यवाही
स्वसंरक्षणार्थ शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळविण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करावा लागतो. अर्जदाराने सादर केलेल्या कागदपत्रांची खातरजमा केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हा प्रस्ताव पडताळणीसाठी संबंधित उपविभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात येतो. पोलिसांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तो पोलीस अधीक्षकांकडे व तेथून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येतो. या प्रक्रियेनंतरच संबंधिताला शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळतो.
परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण
स्वसंरक्षण किंवा शेती संरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याच्या घेतलेल्या परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागते. नूतनीकरण न केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. तसेच शस्त्राचा गैरवापर केल्यास संबंधित परवाना रद्द अथवा काही कालावधीसाठी निलंबितही केला जातो.

Web Title: Nine people pistol in Karhad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.