नेर्लेत अपघात; उद्योजक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2016 00:49 IST2016-02-14T00:49:06+5:302016-02-14T00:49:06+5:30
अज्ञात वाहनाची धडक : गावावर शोककळा

नेर्लेत अपघात; उद्योजक ठार
नेर्ले : पहाटे फिरावयास गेलेले उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विजय हिराचंद्र शहा (वय ६७) यांना पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नेर्ले (ता. वाळवा) येथील हॉटेल दत्त भुवननजीक अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने नेर्ले गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत घटनास्थळ व कासेगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आज पहाटे विजय शहा हे नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी बाहेर पडले होते. गावातून ते महामार्गावर येऊन केदारवाडीपर्यंत दररोज फिरावयास जात असत. शनिवारी सकाळी ६ च्या सुमारास ते महामार्गावरील हॉटेल दत्त भुवनजवळ असताना त्यांना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोके व छातीला मार लागल्याने ते जागीच ठार झाले.
शहा यांचा मेडिकल, किराणा व्यवसाय आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रातही ते सक्रिय होते. माजी मंत्री, आ. जयंत पाटील, माजी आ. विलासराव शिंदे यांचे ते समर्थक होते. त्यांच्या पश्चात २ मुले, सुना, नातवंडे, भाऊ, बहीण असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे. आज बाजारपेठ बंद ठेवून शहा यांना आदरांजली वाहण्यात आली. (वार्ताहर)