वांगी येथील पुरातन नरसिंह मंदिराच्या जीर्णोद्धाराची गरज
By Admin | Updated: August 31, 2014 23:49 IST2014-08-31T22:50:20+5:302014-08-31T23:49:21+5:30
सुमारे १५० वर्षापूर्वी नरसिंह मंदिराची स्थापना कुलकर्णी समाजाने केली होती.

वांगी येथील पुरातन नरसिंह मंदिराच्या जीर्णोद्धाराची गरज
मोहन मोहिते - वांगी -वांगी येथील धोकादायक बनलेल्या नरसिंह मंदिराचा जीर्णोध्दार करण्याची गरज आहे. या मंदिराच्या धोकादायक झालेल्या भिंती उतरून घ्याव्यात अशी मागणी होत आहे.
वांगी येथे सुमारे १५० वर्षापूर्वी नरसिंह मंदिराची स्थापना कुलकर्णी समाजाने केली होती. गावाच्या बरोबर मध्यभागी उंच अशा ठिकाणी पूर्ण दगडी बांधकाम करून या मंदिराची उभारणी करण्यात आली होती. मात्र यानंतर आजपर्यंत कोणतीही सुधारणा करण्यात आली नाही.या मंदिरात अंत्यत सुंदर अशा मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. सध्या मात्र या मंदिराच्या सर्व बाजूच्या भिंती पडल्या आहेत. तसेच मंदिरावर छतही नाही. देवालयात जाण्यासाठी रस्ता नाही. एखाद्या ग्रामस्थाला दर्शन घ्यायचे असल्यास त्याला रस्त्यावरून परत जावे लागत आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे मंदिराच्या उर्वरित राहिलेल्या भिंतीही पडण्याच्या मार्गावर आहेत. मंदिराच्या दोन्ही बाजूने रस्ता आहे. मंदिराच्या राहिलेल्या भिंती कधीही या रस्त्यावर पडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. कारण येथे राहणाऱ्या नागरिकांची लहान मुले या ठिकाणी असणाऱ्या रस्त्यावर सतत खेळत असतात. तरी या मंदिराचा जीर्णोध्दार ग्रामपंचायतीने किंवा या मंदिराच्या असणाऱ्या मंडळाने करून नरसिंहाचे दर्शन गावाला घडवून आणावे. अन्यथा धोकादायक मंदिराच्या राहिलेल्या भिंती तरी काढून घ्याव्यात.
गावातील प्राचीन असणाऱ्या अंबिका मंदिर, महादेव मंदिर, मारूती मंदिर आदी मंदिरांचा लोकवर्गणीतून जीर्णोध्दार करण्यात आला आहे. सर्व मंदिरांच्या सुशोभिकरणाचे काम पूर्ण झालेले आहे. मात्र एकमेव नरसिंह मंदिर नष्ट होत चालले आहे. तरी या मंदिराचा जीर्णोध्दार ग्रामपंचायतीने किंवा मंदिराच्या मंडळाने करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
या मंदिराबाबत या मंडळातील सदस्यांना विचारणा केली असता, दुरूस्तीसाठी या मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता नाही व असणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण असल्यामुळे या मंदिराच्या जीर्णोध्दारात अडचण निर्माण झाली आहे, असे सांगितले. (वार्ताहर)