चांगल्या निर्मितीसाठी शोधक दृष्टीची आवश्यकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:29 IST2021-08-26T04:29:12+5:302021-08-26T04:29:12+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कवठेमहांकाळ : मुलांनी चांगले लेखन होण्यासाठी शोधक नजरेने आपला भवताल अनुभवला पाहिजे. मुलांच्या प्रतिभेला पंख लाभण्यासाठी ...

चांगल्या निर्मितीसाठी शोधक दृष्टीची आवश्यकता
लाेकमत न्यूज नेटवर्क
कवठेमहांकाळ : मुलांनी चांगले लेखन होण्यासाठी शोधक नजरेने आपला भवताल अनुभवला पाहिजे. मुलांच्या प्रतिभेला पंख लाभण्यासाठी वाचनाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. संगीता बर्वे यांनी केले. त्या देशिंग-हरोली येथे अभिव्यक्ती प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या चौथ्या अभिव्यक्ती बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलत होत्या.
बर्वे म्हणाल्या, आपल्या परिसरातून, समाजातून आपण अनुभव घेत असतो. चांगल्या साहित्य निर्मितीसाठी शोधक दृष्टीसोबतच खूप खूप वाचा. शब्दसंग्रह वाढवा. चांगले लिहा. चांगला माणूस बना.
संमेलनाचे उद्घाटक सुभाष कवडे होते. ते म्हणाले, मुलांनी वाचनाचा ध्यास घ्यावा. वाचनाने मुलांचा आत्मकेंद्रितपणा, निराशावाद निघून जाईल. पुस्तके मुलांची जिज्ञासा पूर्ण करतात. लहान मुलांचे भावविश्व समृद्ध करणे म्हणजे प्रभूशी नाते जोडण्यासारखे आहे. या सानेगुरुजींच्या भूमिकेचा विचार करण्याची आज खरी गरज आहे.
संमेलनामध्ये विद्यार्थ्यांचे बहारदार कविसंमेलन झाले. कविसंमेलनाध्यक्ष अस्मिता चव्हाण होत्या. कविसंमेलनामध्ये जिल्ह्यातील निमंत्रित बालकवींनी सहभाग घेतला. यामध्ये तन्मय बेडगे, ऋतुजा चव्हाण, वेदिका खांडेकर, राजवर्धन पाटील, पूजा डुबुले, पूजा,कलढोणे, सृष्टी कुलकर्णी, आर्या पाटील, श्रुती काकडे, आरती कदम, कल्याणी जोशी, सानिका माने, जोत्स्ना सदामते, कल्याणी कलढोणे, अनुजा ओमासे, वैष्णवी घोरपडे व मधुरा जगताप यांनी कवितावाचन केले. उदयनराणा पाटील, गौरवी निकम, अनया पाटील, राजवर्धन पाटील, माहेश्वरी देसाई, श्लोक चव्हाण, सिद्धी पाटील व आर्या पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
कवयित्री मनीषा पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आर्या पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन राहुल निकम, सीमा निकम, प्रा. सर्जेराव पाटील व ॲड. पृथ्वीराज पाटील यांनी केले.