जिल्ह्यात राष्ट्रवादीला हव्यात पाच जागा
By Admin | Updated: June 17, 2014 00:45 IST2014-06-17T00:40:36+5:302014-06-17T00:45:49+5:30
जिल्हाध्यक्षांचे मत : इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर, जत, शिराळ्यावर दावा

जिल्ह्यात राष्ट्रवादीला हव्यात पाच जागा
सांगली : काँग्रेस आघाडीअंतर्गत राष्ट्रवादीकडून विधानसभेसाठी राज्यात जादा जागांची मागणी होत असतानाच, जिल्ह्यातही राष्ट्रवादीने पाच जागांवर दावा केला आहे. गत विधानसभा निवडणुकीत चार जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्या होत्या. यंदा खानापूर-आटपाडी विधानसभेची जागा राष्ट्रवादीला हवी आहे. दुसरीकडे जिल्हा काँग्रेसने सर्वच जागांवर लढण्याचा ठराव करून पक्षाकडे पाठविल्याने जिल्ह्यातही जागावाटपावरून आघाडीअंतर्गत मतभेद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. गत विधानसभा निवडणुकीत दोन ठिकाणी काँग्रेस, तीन ठिकाणी राष्ट्रवादी, तर तीन जागी भाजपला यश मिळाले. काँग्रेसला केवळ पलूस-कडेगाव आणि खानापूर-आटपाडीच्या जागेवर यश मिळाले. सांगली व मिरजेची जागा भाजपने हस्तगत केली होती. त्यामुळे काँग्रेसच्या घटलेल्या ताकदीचे कारण देऊन राष्ट्रवादी जादा जागांची मागणी करण्याची शक्यता आहे. तासगाव-कवठेमहांकाळमधून गृहमंत्री आर. आर. पाटील, इस्लामपूर मतदार संघातून ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, तर शिराळ्यातून मानसिंगराव नाईक यांनी विजय मिळविला होता. या तीन हक्काच्या जागांसह जत व खानापूर-आटपाडीचीही मागणी राष्ट्रवादीकडून होत आहे. जतमध्ये गतवेळी विलासराव जगतापांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. जगतापांची पक्षातून हकालपट्टी झाली असली तरी, या जागेवर राष्ट्रवादीचाच दावा आहे. खानापूर-आटपाडीतून काँग्रेसचे सदाशिवराव पाटील विजयी झाले असले तरी, हा मतदारसंघ राष्ट्रवादीला हवा आहे. या मतदारसंघात राजेंद्रअण्णा देशमुख, अनिल बाबर यांच्यासह अन्य राष्ट्रवादी नेतेही इच्छुक आहेत.
आघाडीचा निर्णय झाला तर या दावेदारीवर विचार होणार आहे. राष्ट्रवादीने पाच जागांच्या मागणीची तयारी केली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी सर्वच जागांवर दावा करून स्वबळाच्या मुद्यास बळ दिले आहे.